देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडाला असून राजकीय चिखलफेक जोरात सुरू आहे. केरळ राज्यात इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्यातच संघर्ष रंगला आहे. डाव्या पक्षांनी पाठिंबा दिलेले आमदार पीव्ही अनवर यांची राहुल गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या गांधी असण्यावर संशय व्यक्त त्यांच्या डीएनए तपासण्याची मागणी केली आहे.
केरळमधील मलप्पुरम येथे सोमवारी एका प्रचार सभेत बोलताना अनवर यांनी राहुल गांधीवर जहरी टीका केली. अनवर म्हणाले, राहुल गांधी यांना गांधी आडनाव वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. ते एखाद्या चतुर्थश्रेणीच्या नागरिकाच्या पातळीपर्यंत घसरले आहेत. मला तर संशय येतो की, ते नेहरूंच्या कुटुंबात जन्माला आले आहेत का? त्यामुळे त्यांचा डीएनए तपासला जावा.
राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केल्यानंतर त्यावर पलटवार करताना अनवर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. अनवर यांच्या विधानाचे विजयन यांनी समर्थन केले आहे. विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे.
विजयन म्हणाले की, राहुल गांधी आता बदलले आहेत. ज्या माणसाने भारतभर पदयात्रा केली आहे, त्याने थोडं ज्ञानही मिळवायला हवं. पण त्यांनी केरळमध्ये येऊन जे विधान केलं, ते त्यांना राजकीय नेता म्हणून शोभणारे नाही. त्यांनी भाजपाला मदत होईल, असे काही बोलू नये.
मागच्या आठवड्यात केरळमधील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, देशातील दोन मुख्यमंत्री सध्या तुरुंगात आहेत. तिसरे केरळचेही मुख्यमंत्री तुरुंगात जाणार नाहीत कशावरून? मी भाजपावर दिवसरात्र टीका करत असतो आणि केरळचे मुख्यमंत्री अहोरात्र माझ्यावर टीका करत असतात. हे जरा संभ्रमात टाकणारं आहे.
Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!
राहुल यांच्यानंतर काँग्रेसनेही मुख्यमंत्री विजयन यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची चौकशी सुरू असल्याने ते मोदींवर टीका करण्याचे टाळतात. विजयन यांची मुलगी विणाच्या आयटी कंपनीत पेमेंट घोटाळा झाला आहे. त्याचबरोबर त्रिशूरमधील सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याने ते भाजप व मोदीवर टीका करण्यास घाबरतात.
काँग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, आणीबाणीच्या काळात राहुल गांधी यांच्या आजीनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना दीड वर्ष तुरुंगात टाकले होते.
2024-04-23T16:02:06Z dg43tfdfdgfd