कस्तुरीचें रुप अति हीनवर

- डॉ. माधवी गोरे-मुठाळ

कस्तुरीचें रूप अति हीनवर। माजी असे सार मोल तया ॥१॥

आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें। परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥

काय रूपें असे परीस चांगला। धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥

फिरंगी आटितां नये बारा रुके। गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥

तुका म्हणे नाहीं जातीसवें काम। ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥४॥

आंतरिक सौंदर्य बहुमोल आहे हे सांगणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आज राहून राहून आठवताहेत.

त्याला कारणही तसेच.... आभासी जगात स्वैर संचार करताना सोडले जाणारे भान हा काही नवीन विषय नाही. हा संचार जोवर स्वतःच्या आभासी अवकाशापुरता मर्यादित आहे, तोवर ठीक; पण सोशल मीडियावर कसेही वागा काही फरक पडत नाही, ही विचारसरणी जेव्हा एखाद्याच्या भावनांशी खेळते, तेव्हा त्याचा परिणाम खूप खोलवर होऊ शकतो, याची या स्वैर संचार करणाऱ्यांना कल्पनाही नसते. असाच एक भयंकर ट्रोलिंगचा प्रकार गेल्या आठवड्यात आपल्या देशात झाला आणि जवळपास ७० टक्के लोकांनी आपण बिनडोक आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

मात्र, जिच्या बाबतीत हे ट्रोलिंग झाले, त्या उत्तर प्रदेशातील दहावी बोर्ड परीक्षेतील टॉपर प्राची निगमची मुलाखत वाचली आणि पाहिली, तर जाणवेल की सत्य तेच सुंदर आणि सुंदर तेच शिव असते. ही मुलगी नुसतीच हुशार नाही, तर अतिशय संयत, समजूतदार आणि निर्लेपही आहे.

‘माझे टॉपर झाल्यानंतरचे फोटो आणि व्हिडिओ बघून लोकांना विचित्र वाटणे स्वाभाविक आहे; कारण मुलींच्या चेहऱ्यावर असे केस नसतात; त्यामुळे त्यांना नवीन वाटलं असेल. असो…...’

‘मला तर त्यांच्या कमेंट्स वाचून कळले, की माझ्या चेहऱ्यात काही प्रॉब्लेम आहे. या चर्चा ऐकून मी बोर्डात आले नसते, तर चालले असते, असे वाटते आहे.’

‘मला माझे कुटुंबीय, मित्र परिवार शिक्षक यांनी कधीही वेगळी विचित्र वागणूक दिली नाही.’

‘ओठांकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला, ना मिळणार आहे.’

‘मला आयआयटी करायचे आहे. त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहिले.’

‘मला त्यांच्या बोलण्याचे काहीच वाटत नाही. ते तितके महत्त्वाचे नाहीसुद्धा.’

‘माझे मार्क, माझा अभ्यास, माझे करिअर जास्त महत्त्वाचे आहे.’

‘मला दोन-तीन मार्क कमी पडले असते, तर मी टॉपर म्हणून जगापुढे आले नसते आणि माझा इतका वेळ वाया गेला नसता.’

ट्रोलिंगवरील प्राचीच्या या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत.

उत्तर प्रदेश बोर्डात ६०० पैकी ५९१ मार्क मिळवून ५५ लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येणाऱ्या प्राचीचे फोटो पाहून नेटिझन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. हे लोण इतके पसरले, की स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता विसरून, सद्सद्विवेकबुद्धी विकून, लोक प्राचीच्या ओठांवर कशी अतिरिक्त लव आहे हे सांगण्यासाठी आणि तिला ट्रोल करण्यासाठी आपली गुडघ्यातली डोकी खाजवू लागले. तिने अभ्यास कसा केला असेल, याचा विचार न करता तिने ओठांवरचे केस का काढले नाहीत, हा त्यांच्यासाठी जास्त मोठा प्रश्न होता. ‘बॉम्बे शेविंग कंपनी’ला तर तिचा इतका पुळका आला, की त्यांनी तिच्या समर्थनार्थ शेविंगची पानभर जाहिरात काढली. यालाच म्हणतात उखळ पांढरे करणे. यावरून नेटिझन्सने कंपनीचा वेगळा समाचार घेतला हे वेगळे सांगायला नको.

प्राचीच्या ओठांवरची अतिरिक्त लव ही कदाचित हर्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, नुसते एका जागेवर बसून केलेला अभ्यास आणि वाढलेले वजन, याचा परिणाम असू शकतो हे या ट्रोलर्सपैकी कुणाच्या लक्षात का आले नसेल? तिच्या यशापेक्षा अधिक तिच्या चेहऱ्याकडे लक्ष दिले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे गोरा चेहरा, नितळ कांती, काळेभोर डोळे, लांबसडक केस, चाफेकळी नाक हे सौंदर्याचे मापदंड ठरवणारा आपला समाज आणि ट्रोलर्सची हीन मानसिकता. हे ट्रोलर्स, म्हणजे ऑनलाइन खिल्ली उडविणारे. स्व:चा आहे तसा स्वीकार न करता आल्यामुळे, हे ट्रोलर्स अशाप्रकारे सोशल मीडियावर एखाद्याची खिल्ली उडवत राहतात. आपले यामुळे कुणीही, काहीही बिघडवू शकत नाही, हा एक फाजील आणि चुकीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो.

या प्रकाराचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे, हातात मिळालेला स्मार्टफोन आणि मनाला वाटेल तसे व्यक्त होण्यासाठी मिळालेला समाज माध्यमांचा पर्याय. या प्रकारणात नाही म्हणायला प्राचीचे जवळचे मात्र तिच्या मदतीला धाऊन आले. मुख्याध्यापक, उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री, शाळेतले तिचे मित्र-मैत्रीण यांनी ‘#डोन्टट्रोलप्राची’ ही चळवळ सुरू केली. त्याला यश येईलही; पण हा लेख या चळवळीचा भाग नसून, प्राचीच्या शूरपणाला सलाम आहे. ‘मला माझ्या मिश्या आवडतात,’ असं म्हणणारी केरळची शाजिया आणि गिनेस बुकमध्ये दाढी-मिश्या ठेवणारी सर्वांत तरुण स्त्री म्हणून नोंद झालेली इंग्लंडची हरनाम कौर, याही अशाच सलामाला पात्र.

ठेविले अनंते तैसेचि रहावे…, असे मानून स्वतःच्या अस्तित्वाचा सहज स्वीकार करता येणे हीच स्वतःवरच्या प्रेमाची पहिली पायरी! प्राचीमध्ये कुठेही नैराश्य, न्यूनगंडाच्या भावनेचा लवलेश नाही, जे की राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारे ट्रोल झाल्यावर कुणालाही येऊ शकते; पण जे प्राचीबरोबर झाले ते कुणाबरोबरही होऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीला हे ट्रोलिंग पचवता येईलच असे नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी प्रत्येक जण तिच्यासारखा निश्चयी, शूर असेलच असे नाही. मग पालक या गोष्टींपासून आपल्या लेकरांना कसे वाचवू शकतील? आणि कुणाला तरी ट्रोल करण्यापासून आपल्या मुलांना दूर कसे ठेवू शकतील, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.

आजच्या काळात मोबाइल फोन ही काळाची गरज बनली आहे, यात वाद नाही; पण तो स्मार्ट फोनच हवा हा अट्टहास चुकीचा हे. मुळात तो वापरण्याचा स्मार्टनेस आपल्यात आहे का? स्मार्टनेस अर्थच अनेक जण चुकीचा घेतील. ट्रोलिंगचा सामना प्राचीनं नीडर होऊन केला. आपले मूलही या ट्रोलिंगच्या जगात भक्कम मनाने उभे करायचे असेल, तर पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

-मुलांना स्मार्टफोन देण्याऐवजी साधा मोबाइल फोन द्या.

-इंटरनेट सेफ्टी आणि सायबर क्राइमबद्दल मुलांना माहिती द्या. त्या आधी ती माहिती तुम्हाला असू द्या.

-मुलांना सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करायला शिकवा.

-कुठेही, कधीही, कुणीही कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करत असेल, तर मुलांनी ताबडतोब आई-वडिलांना येऊन सांगावे, असा विश्वास त्यांच्या मनात तयार करा.

-सोशल मीडिया वापरताना प्रायव्हसी सेटिंग्जचे काटेकोर पालन करा. ते शिकून घ्या आणि मुलांना शिकवा.

-मुले सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन काय करतात यावर लक्ष ठेवा.

-ब्लॉक करता येते, फ्रेंड रिक्वेस्ट नाकारता येते, हे त्यांना शिकवा.

-फोन सोशल मीडिया म्हणजे सर्वस्व नाही, हे त्यांच्या मनात रुजवा व त्यांच्यासह तुमचाही सोशल मीडियावरचा वेळ कमी करा.

-सोशल मीडियाशिवायही एक सुंदर, खरंखुरं‌ जग आहे हे मुलांना दाखवा.

-मुलांच्या मूडकडे लक्ष ठेवा. त्रागा, चिडचिड, गप्प बसून राहणे, नुसते झोपणे, जेवण न करणे हे नैराश्याशी निगडित असू शकते.

-स्वतःमध्ये जे काही सुंदर, चांगले आहे त्याचा शोध घ्यायला मुलांना मदत करा, तुम्हीही शोधा.

-गरज पडल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्या.

-शारीरिक व्याधी, लहानपणापासूनचे आजार, जन्मजात व्यंग, वजन या सगळ्या गोष्टी प्रयत्नांनी आणि थोड्या फार उपचारांनी बदलता येऊ शकतात; पण रंग आणि उंची यात फारसा बदल होत नाही. हे मुलांना, विशेषतः मुलींना सांगणे गरजेचे आहे.

-आपण फक्त ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ होऊन उपयोग नाही‌, ते १०० टक्के शक्य नाही आणि गरजेचेही नाही. काळी-सावळी- गोरी, जाड-बारीक कशीही असो, मुलींनी समर्थ, स्वावलंबी, सहिष्णू, सबल होण्यासाठी प्रयत्न करा.

-मुलींचं शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरण करण्याकडे विशेष लक्ष द्या.

- कोणत्याही गोष्टीला विज्ञानाच्या आणि वास्तवाच्या कसोटीवर घासून बघण्याची दृष्टी मुलांमध्ये विकसित करा.

(लेखिका स्त्री रोगतज्ज्ञ आहेत.)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T07:50:59Z dg43tfdfdgfd