शहरी मतदानाचे टक्केटोणपे

भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव, म्हणजेच लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांत लवकरच मतदान होणार आहे. बारामतीसाठी ७ मे रोजी, तर पुणे, मावळ व शिरूरसाठी १३ मे रोजी मतदान होईल. सध्या प्रचाराने सगळे वातावरण ढवळून निघाले आहे. बारामतीत येत्या मंगळवारी मतदान होणार असल्याने, तेथील प्रचाराची अधिकृत सांगता आज संध्याकाळी होईल. पुणे, शिरूर व मावळचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपेल. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडेल. आतापर्यंत निवडणूक आयोगापासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत, वृत्तपत्रांपासून ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी उद्युक्त व्हावे, म्हणून भरपूर जाहिरात केली आहे. आता या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

गेल्या अनेक निवडणुकांचा अनुभव असा आहे, की ग्रामीण भागात तुलनेने चांगले मतदान होते. मात्र, शहरी भागात मतदानाचे प्रमाण अतिशय कमी असते. ग्रामीण मतदारसंघांत हे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत जाते, तर शहरी भागात हे प्रमाण जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहते.

पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी, म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत ४९.८४ टक्के मतदान झाले होते. पुण्यासारख्या एरवी राजकीयदृष्ट्या जागरूक, सुशिक्षित, बुद्धिमान माणसांच्या शहरात मतदानाबाबतची ही उदासीनता अनाकलनीय आहे. देशभरातही इतर शहरांत साधारण अशीच उदासीनता दिसून येते. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. राजकारणाविषयी मध्यमवर्गीय नागरिकांना सर्वसाधारणपणे असलेला तिटकारा आणि राजकीय व्यक्तींकडून वारंवार झालेल्या अपेक्षाभंगातून आलेली निराशा यामुळे ही उदासीनता दुपटीने वाढलेली दिसते. ‘आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे?’ ही वृत्तीही त्यातूनच येते. मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. या सुट्टीला जोडून इतर सुट्ट्या आल्या, तर परगावी सहलीला जाण्याकडेही बहुतांश शहरवासीयांचा कल दिसतो. याशिवाय मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, नाव-पत्ता अचूक आहे की नाही, हे तपासण्यातही अनेक जण कंटाळा करतात. अनेकांना अगदी मतदान चार दिवसांवर आले, की जाग येते. तेव्हा धावाधाव करून काहीच उपयोग नसतो. वास्तविक, निवडणूक आयोग अगदी एक महिनाभर आधीपर्यंत निवडणूक यादी अद्ययावत करत असतो. आता तर निवडणूक आयोगाचे ‘अॅप’ही आहे. त्यावर कुणीही अगदी सहज आपले नाव नोंदवू शकतो. नव्याने मतदार झालेले तरुण कुणाचीही मदत न घेता, आपापले मतदान ओळखपत्र या ‘अॅप’द्वारे मिळवतात. मात्र, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रस्नेही गोष्टी जमत नाहीत. अशांसाठी बहुतेक वॉर्डा-वॉर्डांतून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदतीसाठी तयार असतात. अनेक ठिकाणी ते शिबिर आयोजित करतात. विशेषत: मोठ्या सोसाय़ट्यांमधून तर निश्चितच अशा प्रकारची सोय बहुतेक ठिकाणी उपलब्ध असते. फक्त अशा ठिकाणी उठून जाण्याची तेवढी आवश्यकता असते. तेही अनेक जण करत नाहीत. शेवटी ज्यांची नावे मतदारयादीत आहेत त्यांनाच मतदान करता येते, हे लक्षात घ्यावे. मतदान ओळखपत्र असेल आणि तुमचे नाव मतदारयादीत नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही. याउलट मतदारयादीत नाव असेल आणि मतदान ओळखपत्र नसेल तरीही मतदान करता येते. मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त ओळखीचे पुरावे म्हणून १२ प्रकारची ओळखपत्रे चालतात. यात आधार कार्डसह पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीअंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, ‘मनरेगा’अंतर्गत जारी करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

शहरी मतदारांची ही उदासीनता एकीकडे आणि शासकीय यंत्रणेतील प्रतिसादाचा निरुत्साह दुसरीकडे अशा कात्रीत सापडलेल्या आपल्या लोकशाहीला शेवटी कमी मतदानाच्या टक्क्याटोणप्यांवर समाधान मानावे लागते. मतदारयादीतून अक्षरश: हजारो नावे गायब होण्याचा प्रकार २०१४ च्या निवडणुकीत घडला होता. ‘मटा’नेच तेव्हा त्यावर मोठी वृत्तमालिका चालवून ही बाब प्रकाशात आणली होती. शासकीय यंत्रणेची ही अनागोंदी मुळीच समर्थनीय नाही. शासकीय कार्यालयात पाऊल टाकायचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला धडकीच भरते. तेथे आपले काम मुळीच होणार नाही; त्यासाठी ओळखच लागते, हा समज नागरिकांच्या मनात घट्ट होण्यास शासकीय यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत. निवडणूक आयोगाची यंत्रणा कागदावर उत्तम काम करीत असली, तरी ती राबविणारे शेवटी ‘सरकारी बाबू’च असतात. त्यात अगदी कारकून स्तरापर्यंत ही ढिलाई वाढत्या प्रमाणात दिसत राहते. तंत्रज्ञानाच्या पातळीवरही सर्व सुविधा नाहीत. उदा. ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाच्या ‘अॅप’मध्ये तुम्ही दोन बदल एकाच वेळी करू शकत नाही. एक तर तुमचा पत्ता तरी बदलू शकता किंवा नावातील बदल तरी करू शकता. यातील एकेक बदल व्हायलाही बराच काळ लागतो. एकाच वेळी हे दोन्ही बदल स्वीकारायला काय हरकत आहे? मतदान ओळखपत्र जुने (१० ते १५ वर्षांपूर्वीचे) असेल तर ते अद्ययावत करण्याची सोय ऑनलाइन उपलब्ध असायलाच हवी. वास्तविक आता ‘आधार कार्ड’ हे आपले नागरिकत्व ओळखपत्र असल्यासारखे झालेच आहे. मग आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी का जोडले जात नाही? दोन्ही ओळखपत्रांतील माहिती आपोआप एकसारखी करून घेणे (लिंक करणे व इन-सिंक करणे) हे ‘आयटी’तील प्रगती मिरविणाऱ्या आपल्या देशाला मुळीच अवघड नाही.

दोन्ही बाजूंनी या त्रुटी दूर व्हायला हव्यात. मतदान केंद्रांवरील सुविधा हा आणखी वेगळा विषय आहे. आपल्याकडे २००४ पासून ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका होतात. त्या नोव्हेंबर-डिसेंबर या काळात खरे तर व्हायला हव्यात. उन्हामुळे देशात अनेक ठिकाणी मतदानाचे प्रमाण घटते. तूर्त त्या उन्हाळ्यातच होत असल्याने मतदारांसाठी पुरेशी सावली, पाणी आदी किमान व्यवस्था करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय नसते. काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र असते आणि लिफ्टची सोय नसते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक तिथूनच माघारी फिरले नाहीत, तर आश्चर्य!

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व पक्षांतील कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते भरपूर मेहनत करत असतात. असे असूनही पुण्यासारख्या शहरी भागात मतदानाचा टक्का ५० टक्क्यांपेक्षा अधिक जात नाही, हे आपल्या शहराला भूषणावह नाही. या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडून आपण ही टक्केवारी विक्रमी पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण मतदानाचा हक्क बजावला, तरच आपल्याला निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना खडे बोलही सुनावण्याचा अधिकार प्राप्त होतो, एवढे ध्यानात ठेवले तरी पुरे!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T06:50:51Z dg43tfdfdgfd