UPSC Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. प्रत्येक वर्षी १० लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेसाठी बसतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात; जे मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नातच यश मिळवितात.
नागरी सेवा परीक्षेच्या तिन्ही फेऱ्या पार केल्यानंतर १० लाखांमधून सुमारे १००० उमेदवार निवडले जातात. राजस्थानच्या जयपूर येथील आशीष सिंघलने देशातील दोन कठीण परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. पहिल्यांदा त्याने आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. परंतु, या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आशीषला अनेक अडचणींचा सामना करवा लागला. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आशीषला बरीच वर्षे मेहनत घ्यावी लागली.
आशीष कुमार सिंघलचा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आशीष लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. शिवाय तो आयआयटी टॉपरदेखील होता, त्याने औद्योगिक व्यवस्थापन विषयात एम.टेक. पदवी घेतली. त्यानंतर त्याने गुरुग्राममधील एका कंपनीत एक वर्ष काम केले; परंतु त्यानंतर चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. मात्र, नागरी सेवा परीक्षेत त्याला अनेकदा अपयशाचे कडू फळ चाखावे लागले. तो नापास झाल्यामुळे अनेकांनी त्याला टोमणेदेखील मारले; पण आशीष कधीही खचून गेला नाही. तो हार न मानता, सातत्याने प्रयत्न करीत राहिला.
यूपीएससी परीक्षेत आशीषला चार वेळा अपयशाचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये तो पहिल्या प्रयत्नात मेन ‘क्लीअर’ करू शकला नाही. २०२० मध्ये तो दुसऱ्यांदा प्रीलिममध्येही नापास झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला पुन्हा मेन ‘क्लीअर’ करण्यात अपयश आले. या परीक्षेत वारंवार नापास झाल्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याला टोमणे मारू लागले. असे असतानाही आई-वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्याने २०२२ मध्ये चौथ्यांदा प्रयत्न केला; पण त्यातही त्याला अपयश आले. या चौथ्या प्रयत्नातील अपयशामुळे तो खूप निराश झाला होता.
चार वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश पदरी आल्यानंतर आशीषने पुन्हा खूप मेहनत घेतली आणि पुन्हा तो परीक्षेला बसला. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व चुका दुरुस्त करून एनसीईआरटी आणि अभ्यासक्रमाच्या यूपीएससी उजळणीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अखेर २०२३ मध्ये आशीष यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि फक्त उत्तीर्णच नाही, तर त्याने या परीक्षेत आठवा क्रमांकदेखील पटकावला.
2024-06-25T07:09:50Z dg43tfdfdgfd