कोल्हापुरातून दोन मुलांचे अपहरण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातून चौदावर्षीय दोन मुलांचे अपहरण झाले आहे. याबाबत राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण बालगृहातील शाळकरी मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद स्वप्नील विष्णू शेटे (वय 40, रा. मिरजकर तिकटी) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता

पेटाळा परिसरातील शाळेत गेला. त्यानंतर तो परत आला नाही. त्याचे अपहरण केल्याचा संशय शेटे यांनी व्यक्त केला. अंगाने मजबूत, रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच, केस काळे बारीक, पाठीवर जुन्या जखमेचा व्रण, डाव्या दंडावर तीळ, अंगात निळा चौकडा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट, पाठीवर शाळेची बॅग असे त्याचे वर्णन आहे. संबंधित वर्णनाचा मुलगा कोणाला आढळल्यास जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी केले आहे.

राजारामपुरी 11 वी गल्ली रेणुका मंदिर परिसरातून एका परप्रांतीय अल्पवयीन मुलाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्याचा भाऊ शिशुपालसिंह बघेल यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली. 14 जूनला रात्री अकराच्या सुमारास अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो रंगाने सावळा असून अंगाने सडपातळ आहे. त्याची उंची 4 फूट असून अडखळत बोलतो. अंगात निळ्या रंगाची जिन्स पँट, आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचे स्पोर्टस् शूज असे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

2024-06-23T04:46:09Z dg43tfdfdgfd