RAJ THACKERAY: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनाला राज ठाकरे प्रमुख पाव्हणे होते. यावेळी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे यांनी ' आयुष्यात तुम्ही कधी घाबरला का आणि पळून जाण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारला.

यावर राज ठाकरे म्हणाले की, 'पळून जाण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. हा पण घाबरलो फक्त मी आईला, आणि माझ्या मुलांच्या आईला घाबरतो' असं म्हणताच सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

तसंच, 'मी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एखादा डाकू हा जर हनिमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या आणि कमरेला बंदूक लावून जातो का, तिथे तो वेगळा असतो. मी माझी तुलना डाकूसोबत करत नाही' असं राज ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हश्श्या पिकली.

...आणि मी तेव्हा पळून गेलो!

तसंच, राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत लग्न जमलं होतं, त्यावेळी घरी सोडण्यासाठी गेले होते, त्यावेळीचा किस्साही सांगितला.

'झालं असं की, 31 डिसेंबरला आम्ही बाहेर गावी गेलो होतो. माझं आणि शर्मिला यांचं लग्न जमलं होतं. पण हे माझे सासरे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं. मी रात्री अडी वाजेच्या सुमारास शर्मिला यांना सोडण्यासाठी गेलो होतो. तर गेटजवळ कुणी तरी फिरताना दिसलं. तेव्हा शर्मिला यांनी सांगितलं की, बाबा आहे. मग मी पुढे जाऊन पाहिलं, मला काही नीट दिसलं नाही. मी म्हटलं, वॉचमॅन आहे. पण, जेव्हा शर्मिला यांनी सांगितलं की, बाबाच आहे. तर मग मी पळून गेलो होतो, आयुष्यात फक्त तेव्हाच पळालो होतो.'

2024-06-29T14:01:11Z dg43tfdfdgfd