BHANDARA GRAIN SCAM:दोन वर्षांत ४० कोटींचा धान घोटाळा; भंडाऱ्यात ११ संस्थांवर गुन्हे दाखल, सहा जणांना अटक

राजू मस्के, भंडारा : जिल्ह्यात २०२१-२३ या दोन वर्षांत तब्बल ४० कोटी ३९ लाख रुपयांचा धान घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी ११ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले तर एका संस्थेवर या महिन्याच्या अखेरीस कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धानाची लागवड केली जाते. सरकारी केंद्रांसोबतच खासगी व्यापाऱ्यांना शेतकरी या धानाची विक्री करतो. नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारकडून बोनस, प्रोत्साहन अनुदान जाहीर केले जाते. यातूनच भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना बळ मिळते. धान घोटाळ्यांची ही मालिका २०११-१२च्या सुमारास सुरू झाली. मागच्या दोन वर्षांत दोषी संस्थाचालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये संत रविदास मागासवर्गीय सेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था तुमसर, आधार सेवा सहकारी संस्था पवनी, अन्नपूर्णा सेवा सहकारी संस्था बपेरा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आंबागड, विविध सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी, विविध सेवा सहकारी संस्था वाहणी, माँ शारदा सेवा सहकारी संस्था मुंढरी बुर्ज., एकता सहकारी संस्था बेला, आकांशा सेवा सहकारी संस्था तुमसर, पुष्पामृत सेवा सहकारी संस्था बेलाटी, राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था गवराळा आदींचा समावेश आहे. यामध्ये भंडारा येथील एका संस्थेवर या महिन्याच्या अखेरीस जिल्हा पणन विभागाकडून पोलिसात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

१ लाख ३६ हजार क्विंटल धानाची तूट

खरीप व रब्बी हंगाम २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत या संस्थांनी ४ लाख ४७ हजार ४३६ क्विंटल धानाची खरेदी केली होती. यापैकी ३ लाख १० हजार ६४७ क्विंटल धानाची राइस मिलमालकांनी उचल केली. त्यामुळे १ लाख ३६ हजार धानाची संस्थाचालकांनी परस्पर विल्हेवाट लावली. चौकशीअंती ही तूट दिसून आल्यानंतर जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भंडारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. संबंधित संस्थाचालकांनी ४० कोटींची परतफेड न केल्यास संस्थाचालकांनी पणन विभागाकडे जमा केलेले १० लाख रुपये आणि ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. या मालमत्तेचा लिलावही केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीआयडीकडून सहा जणांना अटक

भंडारा जिल्ह्यातील सहा राइस मिलमध्ये साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहारप्रकरणी सीआयडीने सहा आरोपींना सोमवारी रात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. हा घोटाळा २०१२-१३मध्ये झाला होता. महेश मनोहर कहालकर रा. बाम्हणी (तुमसर), सुरेंद्र विठोबा वहीले रा. माढंळ (तुमसर), ताराचंद कवडू काहालकर रा. बाम्हणी (तुमसर), भारत ज्ञानिराम ठाकरे रा. श्रीरामनर (तुमसर), रामलाल संपत बांडेबुचे रा. सुकळी (तुमसर), माणिक श्रीराम बोंदरे रा. ढोरवाडा (तुमसर), अशी कारागृहात रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विश्वनाथ माणिकराव कारेमोरे रा. वरठी यास रात्री उशीरा अटक करण्यात आली. विश्वनाथ कारेमोरे हे तुमसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ आहेत. आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाला तांदूळ परत न दिल्याचे आणि शेतकऱ्यांचे खोटे सात-बारा आणि खोटी बिले जोडून अपहार केल्याचे हे प्रकरण आहे.

संस्थाचालकांनी शेतकऱ्यांकडून धान खरेदी केल्यानंतर त्याचा अपहार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. ही शेतकऱ्यांची, पणन विभागाची आणि शासनाच्या निधीची लूट आहे. अशा संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे.-सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T01:05:38Z dg43tfdfdgfd