‘सहमती’वर सहमती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग तिसरा कार्यकाळ आधीच्या दोन्ही कार्यकाळांहून निश्चितच वेगळा असणार, यात शंकाच नाही. स्वपक्षाच्या बहुमताच्या जोरावर दहा वर्षे सत्ता राबविल्यानंतर आता त्यांना घटक पक्षांच्या मदतीवर सरकार चालवायचे आहे. शिवाय संख्येने वाढलेल्या विरोधकांच्या आक्रमकतेलाही त्यांना सामारे जावे लागणार आहे. त्यामुळे आजवरच्या कार्यशैलीला मुरड घालून त्यांना बदल करावा लागेल. तसा बदल ते करीत असल्याचे सोमवारी दिसले. ‘सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक आहेच; परंतु देश चालविण्यासाठी सहमती अधिक महत्त्वाची,’ हे त्यांचे विधान बदल सूचित करणारे आहे.

अठराव्या लोकसभेची सुरुवात करण्याच्या आधी माध्यमांशी बोलताना मोदी यांनी ‘सर्वसहमती’ची केलेली उक्ती प्रत्यक्षात कृतीत येते की नाही, हे लवकरच कळेल. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदाच एखाद्या सरकारला सलग तिसरा कार्यकाळ मिळाल्याचा उल्लेखही मोदींनी केला. त्याचबरोबर देशातील जनतेला ‘चांगले आणि जबाबदार विरोधक’ हवे असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांना गोंधळ करणारे, नाटक करणारे विरोधक नको असतात, असे नमूद करून पंतप्रधानांनी ‘चांगले विरोधक’ म्हणजे कोण हेही सांगून टाकले आहे. ‘चांगल्या’ आणि ‘जबाबदार’ विरोधकांनी लोकांचे प्रश्न मांडायला हवेत आणि सरकारला, तसेच पंतप्रधानांना उत्तरदायी ठरवायला हवे हे खरे; परंतु विरोधक प्रश्न विचारतात तेव्हा सरकार पक्षाकडून उत्तरे येत नाहीत, हा अनुभव नाकारता येण्यासारखा नाही. पंतप्रधानांच्या विधानाला उत्तर देताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. मणिपूर हिंसाचारापासून सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीपर्यंत अनेक प्रकरणांत पंतप्रधान मौन बाळगून असल्याकडे खर्गे यांनी बोट दाखविले आहे. मात्र, पंतप्रधानांप्रमाणे त्यांनीही ‘सर्वसहमती’चा मुद्दा उचलून धरला आहे.

सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करीत असलेले ‘सर्वसहमती’ची भाषा महत्त्वाची आहे. संसदेत ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी या दोघांचीही आहे. अठराव्या लोकसभेत नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी हंगामी सभापतीची निवड मात्र सहमतीने झाली नाही. लोकसभेवर सात वेळा निवडून आलेले भाजपचे भर्तृहरी महताब हे हंगामी सभापती झाले आहेत. विरोधकांनी काँग्रेसचे के. सुरेश यांचे नाव सुचविले होते. ते १९८९पासून निवडून येत आहेत. मात्र, १९९८ आणि २००४मध्ये ते पराभूत झाल्याने त्यांचे नाव घेतले नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. एकूणच सहमतीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची सहमती असली, तरी आरोप-प्रत्यारोपांचा खेळ कायम राहणार, अशीच चिन्हे दिसतात.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T06:49:39Z dg43tfdfdgfd