दादा म्हणाले, वाचाळवीरांनी मर्यादा पाळावी; नितेश राणेंचे चॅलेंज, अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या

मुंबई : वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं सांगत अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. 

मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं समजतंय. पण नितेश राणेंनी मात्र यावरून अजितदादांनाच चॅलेंज दिलंय. अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं आमदार नितेश राणे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणेंची पाठराखण केल्याचं दिसतंय. 

अजितदादांची दिल्लीच्या नेत्यांकडे तक्रार

भारतीय पक्षातील काही नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात असून त्याबद्दल अजित दादांनी केंद्रातील नेत्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे ही माहिती खरी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. 

दादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या

अजितदादांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी काही सांगितलं तर तसे वागू. जे आमची दिल्लीला तक्रार करतात त्यांनी गणेश मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवर आक्षेप घेत त्याचा निषेध करायला हवा होता. पण तसं त्यांनी केलं नाही. 

अजितदादांचा वाचाळवीरांना दम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतल्या वाचाळवीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच दम दिला. वेडंवाकडं विधान करून घटकपक्षांना अडचणीत आणू नका, अशा शब्दांत दादांनी कान टोचलेत. भाजप आणि शिवसेनेतल्या अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे अजितदादांनी लाडकी बहीण कार्यक्रमात अशा नेत्यांना कडक शब्दांत ताकीद दिलीय. 

गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी अजितदादांनी कडक भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर त्यांच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली असून भाजप श्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप आमदार नितेश राणेंनी मुस्लिमांविरोधात केलेली वक्तव्य अनेकदा वादग्रस्त ठरली आहेत. त्यांच्यासह अनेक नेत्यांवर बोलत असताना मुस्लिमांविरोधात वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही, असं अजितदादांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आजही लाडकी बहीण कार्यक्रमात बोलत असताना दादांनीही अनेकांचे कान टोचलेत.

फडणवीसांकडून नितेश राणेंची पाठराखण

अजितदादांनी वाचाळवीरांची तक्रार केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित दादा यांनी तक्रार केली का, कोणाकडे तक्रार केली याबद्दल माहिती नाही. मात्र नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करत आहे. नितेश राणे बोलतात त्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. यासाठी स्वतः नारायणराव राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली आहे. यापुढे ते काळजी घेतील.

ही बातमी वाचा: 

2024-09-19T14:07:37Z dg43tfdfdgfd