गरज सायबर साक्षरतेची

डॉ. दीपक शिकारपूर

आता साक्षरतेची व्याख्याच बदलली आहे. आजच्या युगात लिहिता-वाचता येण्याबरोबरच ज्याला संगणक, मोबाईल अशी डिजिटल उपकरणे वापरता येतात, तीच व्यक्ती खरी साक्षर आहे. अनेकवेळा मध्यस्थ, दलाल निरक्षरतेचा फायदा घेऊन लाभ मिळवतातात. यासाठी सर्व भारतीयांना डिजिटली साक्षर करणे हे महत्त्वाचे आहे. त्याासाठी आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आज (दि. 8 सप्टेंबर) जागतिक साक्षरता दिन. त्यानिमित्ताने...

तंत्र साक्षरता आणि महिला

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी 1965 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी तेहरानमध्ये प्रथमच जागतिक स्तरावर शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी जगात साक्षरतेचे प्रमाण सुमारे 60 टक्के होते. एखादा देश विकसित आहे का, याचा प्रमुख निकष कितपत साक्षरता आहे यावर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या व्यक्तीला लिहिता-वाचता येत असे, अशांना साक्षर म्हणत. त्याकाळी फक्त 12 टक्के लोक साक्षर होते. 2040 पर्यंत 100 टक्के साक्षरता आपल्या देशात असेल, अशी अपेक्षा आहे. पण आता साक्षरतेची व्याख्याच बदलली आहे. आज भारत एक अत्यंत गतिमान अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणानंतर चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्था बर्‍याच सुधारल्या. अ‍ॅन्ड्र्यू हेवूडसारखा राजकीय तज्ज्ञ तर 21 वे शतक हे आशियातील राष्ट्रांचे असेल असे म्हणतो. आज या देशातले जवळपास 75 टक्के लोक साक्षर आहेत. हरित क्रांतीनंतर अन्नधान्याच्या बाबतीतही देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्यासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांकडे जायची गरज आता उरली नाही. एक अत्यंत स्थिर लोकशाही म्हणून भारताची वाटचाल सुरू आहे. आणीबाणी वगळता कुठलीही राजकीय अस्थिरता या देशाला पूर्णपणे हेलावून सोडू शकली नाही.

140 कोटींहून जास्त लोकसंख्या असलेला भारत नावाचा हा देश ताठ मानेने जगात उभा आहे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचालही करत आहे. स्वातंत्र्यानंतरची सध्याची तरुण पिढी ही भारतातली तिसरी युवा पिढी म्हणता येईल. 2025 साली जगातला सगळ्यात तरुण देश भारत असेल, असं म्हटलं जात आहे. आजच्या युगात लिहिता-वाचता येण्याबरोबरच ज्याला संगणक मोबाईल अशी डिजिटल उपकरणे वापरता येतात, तीच व्यक्ती खरी साक्षर आहे. अनेकवेळा आपण सबलीकरण हा शब्द ऐकतो. योग्य माहिती योग्यवेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे म्हणजेच व्यक्ती सबल करणे असे म्हणता येईल. पूर्वी योग्य माहितीपासून लोक वंचित राहात असत. त्यामुळे अनेक संधी नाकारल्या जात. आता डिजिटल युगात हे अशक्य आहे. याचसाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची आहे. अनेकवेळा मध्यस्थ, दलाल या निरक्षरतेचा फायदा घेऊन लाभ मिळवतात. यासाठी सर्व भारतीयांना डिजिटली साक्षर करणे हे महत्त्वाचे आहे. इथे आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. इंटरनेटमुळे भारतीय नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याच्या संदर्भात झालेला फार मोठा बदल म्हणजे आपल्याकडील बरीच सरकारी कामे नेटवरून होऊ लागली आहेत! पूर्वी तंत्रज्ञान व संलग्न तंत्रे फक्त मूठभर श्रीमंतांच्या हातात असत. बहुजन समाज त्यापासून लांबच होता. चैनीच्या गोष्टी म्हणून उपकरणांची संभावना एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी होत असे. घरोघरी मातीच्या चुली जाऊन स्मार्टफोन, संगणक आले. तरुण पिढीने ते लवकर आत्मसात केले. पण प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांनीही यापासून दूर जाऊ नये. आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला हरप्रकारे क्षम, स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करेल. नुकतेच काही परदेशी पाहुणे पुण्यात आले होते. मी काही काळ त्यांचा यजमान होतो. त्यांना स्ट्रीटफूड व पुणेरी जेवण हवे होते. मी त्यांना काही ठिकाणी घेऊन गेलो. ठिकठिकाणी दिसणारी डिजिटल पेमेंटची चित्रे व क्यूआर कोड स्कॅन करायची सोय बघून ते अवाक् झाले. ते म्हणाले, आम्ही जग फिरलो. पण अशी सोय जगात कुठेही नाही. भारत देश खर्‍या अर्थाने डिजिटल झाला आहे. मोबाईल व डिजिटल उपकरणांच्या विक्रीत आपला देश जगात पहिल्या क्रमांकाचा आहे. आपले आयुष्य, व्यवहार, उद्योग, व्यापार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित व लोकप्रिय झाले. पण त्याचबरोबर दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह एखाद्या विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. अनेकदा वेळ नसल्याने पालक व पाल्यांचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे संगणक, मोबाईल, टीव्ही ही उपकरणे मुलांच्या संवादाची साधने बनली आहेत. बरेच 8-14 वयोगटातील विद्यार्थी त्याच्या आहारी जाऊन तेच आपले विश्व या भ्रमात वावरतात. नैराश्य, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व व काही व्यक्ती चक्क आत्महत्येचा मार्ग त्यामुळे स्वीकारत आहेत. इंटरनेटवर अनेक गुन्हेगार वावरत असतात तसे अतिरेकी मनोवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेत स्थळांची सफर करताना सावधपणा अंगी बाळगणे जरूरीचे असते. यामधील अजून एक काळजी करण्यासारखी बाब म्हणजे गुन्हेगार व बळी पडणारे यांचे आयुर्मान 20 हून कमी असणे (काही वेळा फक्त 14 वर्षाचे बालसायबर गुन्हेगार सापडले आहेत) भारतासारख्या युवाकेंद्रित देशाला ही चिंतित करणारी बाब आहे.

तंत्रज्ञान हे सुर्‍यासारखे असते. एखादे फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याचा खून करण्यासाठी. तंत्राला वापरणारे मन, विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेत अनेक वेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामांसाच्या विकृत खुनी व्यक्तीने केले. पण भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकतील. त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मनुष्य. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. आधुनिक तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरणे म्हणजे सायबर संस्कार. शाळा-महाविद्यालये इथेही संगणक / स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. नागरिक शास्त्र या विषयात याचा समावेश व्हायची हीच वेळ आहे. हिवाळी व उन्हाळी सुट्टीत अनेक संस्था उपयुक्त संस्कार वर्ग आयोजित करतात. त्यामध्ये आता सायबर संस्कार अंतर्भाव करायची वेळ आली आहे. खरं तर एसएससी / सीबीएसई बोर्डांवर सरकारने पाचवीच्या अभ्यासक्रमात स्मार्ट मोबाईल / संगणक वापर हा धडा समाविष्ट केला पाहिजे .

सायबर संस्कार प्रशिक्षणात पुढील गोष्टी असाव्यात. 1) स्मार्टफोन वापर, 2) सोशल मीडिया माहिती पोस्ट करणे, 3) मर्यादित सेल्फी, 4) योग्य चलत चित्रण (पॉर्न म्हणजे काय), 5) स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल, 6) सायबर गुन्हेगारी, कायदे व गुन्हेगारांना झालेल्या शिक्षा, 7) आक्षेपार्ह आढळल्यास काय करावे, 8)ऑनलाईन जुगार, बेटिंग कसे घातक आहे, 9) अ‍ॅप / सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याआधी घ्यायची काळजी, 10) अतिवापर किंवा सायबर व्यसन कसे टाळावे?

आयटी म्हणजे ‘इंडियाज टुमॉरो’ हे जर प्रत्यक्षात आणायचे असेल तर सर्वांचे सायबर प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. यामध्ये सरकार, सेवाभावी संघटना, उद्योग (सीएसआर), शिक्षण, प्रशिक्षण संस्था या सर्वांनी एकदिलाने संघभावनेने काम करायला हवे. तरच 2047 मध्ये आपला देश विकसित, साक्षर, सुरक्षित (भौतिक व सायबर) व जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असेल. हाच साक्षरता दिवसाचा खरा अर्थ आहे. त्याचबरोबर मूल्ये, नीतिमत्ता, राष्ट्रप्रेम, सर्वसमावेशकता, संवेदनशीलतासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. स्वयंशिस्त व चांगला नागरिक घडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. साक्षरतेचा खरा अर्थ हा आहे. जर आपण शिकलेले असाल, पण आपले सर्व ज्ञान आपण गैरमार्गाने वापरत असाल तर आपण पारंपरिक द़ृष्टीने साक्षर, पण नीतिमत्तेच्या कसोटीवर निरक्षर आहोत. अनेक सायबर गुन्हेगार उच्चशिक्षित, अतिसाक्षर असतात. पण त्याचा उपयोग काय? त्याचबरोबर अजून एक मुद्दा आहे. समाजातील दुर्लक्षित, दिव्यांग व्यक्तींना तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभे करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. इथे सर्वसमावेशक साक्षरता हवी आहे.

नैतिक वापर म्हणजेच संगणक साक्षरता

2024-09-07T23:53:25Z dg43tfdfdgfd