NASHIK-MUMBAI HIGHWAY: महामार्गावर 'आपटी'; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मुंबई मार्गावर खड्डे 'जैसे थे'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : खुद्द मुख्यमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेला अल्टिमेटम देऊन, उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरून आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही नाशिक-मुंबई महामार्ग खड्डेमुक्त होऊ शकलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना अजूनही या महामार्गावरून जाता-येताना जागोजागी ‘आपटी’ खावी लागत आहे.

ठाणे ते नाशिक या अडीच तासांच्या प्रवासाला खड्ड्यांमुळे अद्यापही साडेपाच तास लागत असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सुरू असलेली रस्त्याची कामे आणि जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे यामुळे जुलै महिन्यापासून या महामार्गावरील प्रवास खडतर बनला आहे. याबाबत उद्योजकांसह नागरिकांनी आवाज उठवूनही शासकीय यंत्रणा ढिम्मच राहिली. अखेर खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत या महामार्गाच्या दुरवस्थेच्या तक्रारी पोहोचल्यानंतर त्यांनी या महामार्गाची पाहणी केली अन् दहा दिवसांत हा महामार्ग दुरुस्त करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नाशिकच्या उद्योजकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्योजकांना त्वरित रस्ता दुरुस्तीची ग्वाही दिली. मात्र, त्यानंतर महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही या रस्त्यात सुधारणा होऊ शकलेली नाही. सध्या सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक वाढली असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. नाशिकमधील एक उद्योजक ठाणे येथून दुपारी तीन वाजता निघाल्यानंतर त्यांना नाशिकला पोहोचण्यास रात्रीचे साडेआठ वाजले. नाशिक ते ठाणे हे अंतर अवघ्या अडीच तासांचे आहे. मात्र, त्यासाठी साडेपाच तास लागत असतील, तर यंत्रणेने इतके दिवस काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या सणांमुळे सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढलेला असून, त्यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने या खड्डेमय महामार्गावरून प्रवास करणे प्रचंड जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे उद्योजकांसह अन्य प्रवासीवर्गाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी आश्वासने देऊनही मुंबई महामार्ग ‘जैसे थे’ आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी या कामाकडे वळवला असता, तर कदाचित महामार्ग दुरुस्त होऊ शकला असता. अख्खा पावसाळा गेला, तरी प्रशासन हलले नाही.-जयप्रकाश जोशी, ज्येष्ठ उद्योजककर भरून हाल कशासाठी?

ठाणे येथून नाशिकला येण्यास साडेपाच तास लागल्याचा अनुभव एका उद्योजकाने ‘मटा’ला सांगितला. रीतसर कर, टोल भरून प्रवाशांचे हे हाल होत असतील, तर त्यांना वाली कोण, असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला आहे.

-खड्डेमय महामार्ग अन् जागोजागी सुरू असलेल्या कामांमुळे प्रवास खडतर

-ठाणे-नाशिक या अडीच तासांच्या प्रवासाला लागताहेत साडेपाच तास

-मंत्र्यांच्या आश्वासनानंतर महिना उलटूनही खड्ड्यांचा ताप कायम

-यंत्रणेने महिनाभर केले तरी काय, असा सवाल होतोय उपस्थित

-सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक वाढल्याने उद्योजकांसह अन्य प्रवासीही बेजार

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-16T08:58:56Z dg43tfdfdgfd