MUMBAI SCHOOL NEWS: पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार, स्कूल बस चालकांनी या निर्णयाचा का केलाय विरोध ?

Mumbai School News: मुंबईतील साधारणपणे 80 टक्के विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी आणि परत घरी येण्यासाठी खासगी बस, खासगी व्हॅन आणि रिक्षा या वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात. पण जर सकाळी 9 नंतर शाळा भरणार असतील तर वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होऊ शकतात. शाळांच्या वेळांबाबतच्या सक्तीमुळे बसचालकांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. परिणामी या वाहनांचे भाडे वाढल्याने पालकांना हा त्रास सोसावा लागणार आहे. दरम्यान पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी स्कूल बस चालकांकडून करण्यात आली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अनिल गर्ग यांनी दिला आहे. हा विरोध का होतोय आणि यामुळे आर्थिक भुर्दंड कसा पडणार ते समजून घेऊयात. (Mumbai News)

बसचालकांचा विरोध का ?

मुंबई, पुणे, ठाणे आणि या शहरांमध्ये आणि आसपासच्या उपनगरीय भागात कार्यालयात जाणाऱ्यांची गर्दी सकाळी जास्त असते. विशेषतः सकाळी आठनंतर वाहतूक कोंडी या ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांच्या वाहनांमुळे प्रचंड वाढते. मुलांना शाळेत नेणारी वाहने या वेळेच्या आधी पहिल्या सत्रातील मुलांना शाळेत पोहोचवतात. त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा तितकासा त्रास होत नाही. त्यानंतर काही तासांनी दुपारच्या सत्रातील मुलांना शाळेत नेण्याचे काम सुरु होते. त्यावेळी वाहतूक कोंडी तुलनेने कमी असते. याच गाड्यांतून पहिल्या सत्रातील मुलांना शाळेतून पुन्हा घरी आणले जाते. त्यामुळे बसगाड्यांच्या फेऱ्या वाचतात. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते. जर नऊनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरण्याची सक्ती झाली तर स्कूल बस चालकांचा त्रास वाढणार आहे. त्यांचे सगळे वेळापत्रक कोलमडणार आहे. अशा अनेक कारणांमुळे स्कूल बस चालकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. आता स्कूलबस चालकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार निर्णयात बदल करणार का, ते पाहावे लागेल.

खर्चाचे गणित बिघडणार

बसगाड्यांची संख्या वाढली तरच बसचालकांना मुलांना शाळेत नेण्यासाठीआणि आणण्यासाठी फेऱ्या वाढविणे शक्य होईल. बसगाड्या वाढल्या तर त्यासाठी चालक, मदतनीस, महिला सहकारी असे सगळे कर्मचारीही वाढवावे लागणार. तसेच इंधनाचा खर्चदेखील यामुळे वाढणार आहे. त्यामुळे स्कूलबसच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे बसचालकांसाठी खर्चिक प्रकरण ठरणार आहे. परिणामी बसचालक पालकांकडून हा खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे वाहतूक सेवेवरील खर्चात वाढ होणार आहे.

2024-04-23T06:01:46Z dg43tfdfdgfd