MAHARASHTRA WEATHER: अवकाळीचे संकट टळेना, आज मराठवाड्यासह या भागात पावसाची शक्यता

Unseasonal Rain in Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच आज राजधानी मुंबईसह राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या भागात उष्णतेची लाट आली आहे आणि कोण्त्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घेऊयात...

राज्याच्या या भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातीस काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज (24 एप्रिल) वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर उद्याही राज्याच्या काही भागात वादळी वारा वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या काळात राज्यातील काही भागात 30 ते 40 किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट

आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातरा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगलीसह विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, आणि घराबाहेर पडायचे असल्यास योग्य ती काळजी घ्या असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

25 एप्रिल रोजीही राज्यातील विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यासह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. तसेच अहमदनगर, बीड, धाराशिव, सोलापूर आणि वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही वाशिममध्ये झाली आहे. वाशिममध्ये 43. 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे.

2024-04-24T00:49:33Z dg43tfdfdgfd