Water cut in Kalyan Dombivli City (कल्याण डोंबिवलीत पाणी कपात): मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात घट होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता कल्याण डोंबिवलीत पाणी कपात करण्यात येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या वेळेत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणत्या विभागात पाणी पुरवठा होणार नाहीये.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 150 द.ल.लि. मोहिली उंदचन केंद्र (नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र) आणि 100 द.ल. लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथून NRC - 2 फीडरद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कंपनीने टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील NRC - 2 फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी शट डाऊन घेण्यात येणार आहे.
या कामासाठी गुरुवारी 2 मे 2024 रोजी शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी 2 मे रोजी वारावे जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम करायचे आहे. यामुळे गुरुवार 2 मे 2024 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (एकूण 9 तास) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊन दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व आणि पश्चिम), कल्याण ग्रामिण विभाग (मांडा - टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) आणि डोंबिवली (पूर्व आणि पश्चिम) परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.