Weather update : महाराष्ट्राला हवामान विभागाकडून हायअलर्ट; पावसाबाबत मोठी बातमी
महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका असून शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास दिवसभर शहरात उष्णतेची लाट राहिल मात्र त्यानंतर सध्यांकीळ मघेगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईतील तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. पुढील दोन तीन दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार आहे.
2024-05-14T10:32:50Z