CBSE PATTERN MAHARASHTRA SCHOOLS: सरकारी शाळांमध्ये आता 'सीबीएसई'चे धडे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

CBSE Pattern In State Boards of Education Maharashtra: राज्यातील शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी हाती येत आहे. राज्यातील सरकारील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सीबीएसईकडे असलेला ओढा लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न दिसणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी केंद्रीय शाळांना महत्त्व दिले आहे. मोठ्या प्रमाणात पालक आपल्या पाल्यांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांत प्रवेश मिळवून देत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशांचं प्रमाण कमी झालं आहे. अनेक ठिकाणी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली आहे.

मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा प्रयत्न - केसरकर

केसरकर म्हणाले, "मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक सीबीएससी बोर्डाच्या शाळांना पसंती देत आहेत. परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र बोर्डातील मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाईल."

अकरावी-बारावीला मराठी विषय अनिर्वाय

अलीकडेच एका पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर यांनी राज्य सरकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केल्याची माहिती दिली. सीबीएससी पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य असेल, असेही ते म्हणाले. या आधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय अनिर्वाय असेल असेही केसरकर म्हणाले.

2024-09-18T09:56:27Z dg43tfdfdgfd