नाशिकरोडला युवकाची हत्या

नाशिक : गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या हाणामारीचा राग मनात ठेवून नाशिकरोड भागातील सुंदरनगर येथील युवकावर सात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून हत्या केली. या प्रकरणी तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देवळाली गावातील सुंदरनगर येथील अरमान शेख (१८) हा मंगळवारी रात्री मित्रासह सुंदरनगर, रोकडोबावाडीमार्गे जय भवानी रोडकडे जात होता. शेख हा अण्णा गणपती रोडकडून रोकडोबावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला असता तेथे असलेल्या गतीरोधकाजवळ लपून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे, टक्या, झिंग्या, रवी राठोड, आकाश दिनकर आणि दोन अनोळखी युवकांनी शेख याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढविला. पाठीवर, डोक्यावर वर्मी मार लागल्याने शेख कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. आजूबाजूच्या नागरिकांनी शेख याला बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा…“बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती, त्यामुळेच…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सचिन चौधरी आदींसह इतर अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी व बिटको रुग्णालयात धाव घेतली. गुन्हे शोध पथकाने बुधवारी पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत झिंग्या, रवी राठोड आणि आकाश दिनकर या संशयितांना ताब्यात घेतले. मुख्य संशयिताच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असतानाही गुन्हे घडतच आहेत. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या हत्येने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.

2024-05-08T14:11:18Z dg43tfdfdgfd