दिल्ली सरकारमध्ये नवे मंत्री की जुने चेहरे? कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी? चर्चांना उधाण

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आतिषी मार्लेना यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी शनिवारी होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होईल की, जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच नव्या मंत्रिमंडळातील रिक्त पदांवरील प्रादेशिक व जातीय समीकरणे सोडवण्याचा प्रयत्न केजरीवाल करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर, २६ आणि २७ सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

घटनात्मक तरतुदींनुसार दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने मुख्यमंत्र्यांशिवाय जास्तीत जास्त सहा मंत्री असू शकतात. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले जुने मंत्री आधीची कामे पुढे नेण्यासाठी आणि धोरणात्मक बाबी सुरळीत चालवण्यात अधिक योगदान देऊ शकतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्याने ‘आप’ मोठ्या प्रमाणावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार नाही, अशी चर्चा आहे.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी झाली. यानंतर केजरीवाल आपले गुरू आहेत, असे आतिषी यांनी नमूद केले. ‘त्यांचे अभिनंदन करू नये, हार घालू नयेत. कारण केजरीवाल यांनी राजीनामा देणे, हा त्यांच्या आणि दिल्लीच्या नागरिकांसाठी दुःखाचा क्षण आहे. त्यांना भाजपकडून सतत त्रास दिला जात आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘दिल्लीतील नागरिक पुन्हा मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवत नाही, तोपर्यंत हे पद स्वीकारणार नाही. महाराष्ट्र आणि झारखंडसह नोव्हेंबरमध्येच दिल्लीतही विधानसभा निवडणुका घ्याव्यात,’ अशी मागणी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केली होती.

‘चेहरा बदलला, तरी चारित्र्य तेच’

आतिषी यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर ‘चेहरा बदलला, तरी केजरीवाल व आपचे भ्रष्ट चारित्र्य तेच आहे. दिल्लीची जनता याचा जाब विचारणार आहे,’ अशी टीका भाजपने केली. मुख्यमंत्री बदलले, मात्र ‘आप’चे नशीब बदलणार नाही, असे मंत्री पियुष गोयल म्हणाले. ‘केजरीवाल यांना मनीष सिसोदिया यांच्या दबावामुळे ‘त्यांच्या पसंतीच्या’ व्यक्तीकडे मुख्यमंत्रिपद सोपवता आले नाही. त्यांनी आतिषी यांना अनिच्छेने मुख्यमंत्री केले,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केली.

मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार

पदाचा राजीनामा दिल्यावर केजरीवाल पुढच्या १५ दिवसांत मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत. ते यानंतर कुठे राहतील, हे अद्याप ठरलेले नाही, मात्र मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सरकारी सुविधाही केजरीवाल सोडतील, असे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले.

तर 'ज्या व्यक्तीचे कुटुंब दहशतवादी अफझल गुरूसाठी लढले, त्यांनाच पक्षाने मुख्यमंत्री केले, हे दुःखद आहे. आता देवच दिल्लीचे रक्षण करो.' अशी खोचक टीका ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-19T00:57:36Z dg43tfdfdgfd