तप्त पृथ्वीच्या झळा

दक्षिण आणि नैर्ऋत्य युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, आशिया... खंडात्मक प्रदेशांचा हा उल्लेख एवढ्यासाठीच की गेल्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये त्यांतील कोणत्या ना कोणत्या मोठ्या भागात उष्णतेची लाट आली होती. एकाच वेळेला इतक्या मोठ्या प्रदेशांत उष्म्याची लाट येणे हे पृथ्वी अधिक उष्ण होत असल्याचे लक्षण आहे. गेल्या वर्षातील जगभरातील उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा ‘ताप’ वाढत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा तीव्र होत असल्याचा अनुभव येत असल्याने हा निष्कर्ष अगदीच नवा नाही; परंतु हवामानातील बदलांबाबत ते देत असलेल्या इशाऱ्यांपासून बोध घेणे हे जगभरातील धोरणकर्त्यांचे कर्तव्य आहे.

प्रदूषणामुळे कार्बन डाय ऑक्साइडसहित अनेक वायूंचे उत्सर्जन वाढत असून, त्याचा परिणाम पृथ्वी तापण्यावर होत असल्याचे वैज्ञानिक गेली तीन दशके सांगत आहेत. जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करण्याच्या आणि पर्यावरणपूरक विकासाचे नवीन प्रतिमान विकसित करण्याच्या आणाभाका आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला सुरुवात होऊनही अडीच दशके लोटली आहेत. मात्र, बहुतेक देश भौतिक विकासाच्या पारंपरिक संकल्पनांनाच कुरवाळत बसले आहेत. आजवरच्या प्रदूषणाला सर्वाधिक कारणीभूत असलेल्या अमेरिकादी देशांची दुटप्पी नीतीही त्याला तितकीच कारणीभूत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या जागतिक परिषदांतून पर्यावरणावर चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात घडते ते राजकारणच. उत्सर्जन कमी करण्याचे आणि तापमानवाढ रोखण्याचे उद्दिष्ट कागदावरच राहते. उष्णतेच्या लाटांत होणारी वाढ आणि एकूणच अवर्षण, अतिवृष्टी, चक्रीवादळे आदी नैसर्गिक आपत्तींत होणारी वाढ ही या राजकारणाची फलश्रुती म्हणता येईल. या राजकारणावर मात करणारे धोरण प्रत्येक देशांना अवलंबण्याची गरज आहे. त्या दिशेने संथगतीने का होईना भारताची वाटचाल होत आहे.

विकसनशील देश असूनही आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व मोठे असूनही भारताने उत्सर्जन घटविण्याबाबत कटिबद्धता दर्शविली आहे, ही चांगली बाब. मात्र, केवळ कटिबद्धता दाखवून चालणार नाही, तर कृतीही आवश्यक आहे. कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताने दूरवरचे लक्ष्य ठेवले असले, तरी त्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील असायला हवे. देशातील आघाडीच्या शंभरापैकी निम्म्याहून अधिक कंपन्यांनी आपल्या कार्बन उत्सर्जनाची माहिती देण्याचा घेतलेला निर्णय हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. अशा कृतिशील प्रयत्नांची संख्या वाढणे हीच आजची मुख्य गरज आहे

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T08:13:58Z dg43tfdfdgfd