किती करणार शहर बोडखं?

छत्रपती संभाजीनगर शहर परिसराला २१ एप्रिल रोजी वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आणि तासाभरात निसर्गाचं तांडव अनुभवायला मिळालं. याच सुमारास मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अशाच प्रकारे तडाखा बसला. मराठवाड्यात व इतरही ठिकाणी सातत्याने होणारा अवकाळी पाऊस, वादळ-वारा हा हवामान बदलाचाच भाग आहे का आणखी काही, याचा यथोचित अभ्यास होणे गरजेचे आहेच; कारण अशा वादळांची व अवकाळीची फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.

याच २१ एप्रिलच्या वादळात अनेक छोटी-मोठी झाडे कोसळली. सुमारे ७३-७४ झाडे छत्रपती संभाजीनगर शहरात कोसळल्याची नोंद पालिकेच्या अग्निशमन विभागात झाली. अर्थात, नेहमीप्रमाणे वादळ सुरू होण्यापूर्वीच ‘महावितरण’च्या सेवेने ‘हात वर’ केले आणि विद्युतपुरवठा खंडित झाला. हा खंडित झालेला विद्युतपुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक ठिकाणी ३० तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. वादळात झाडे पडलीच; पण त्या दिवशी आणि नंतरच्या काही दिवसांपर्यंत विद्युत विभागाकडून वाट्टेल तशी झाडांची कत्तल झाली. जो काही थोडाफार परिसर झाडांमुळे हिरवागार वाटत होता, तो अक्षरश: बोडखा झाला. झाडांच्या कितीतरी मोठमोठ्या फांद्या वाट्टेल तशा पद्धतीने वेड्या-वाकड्या तोडण्यात आल्या आणि त्यामुळे झाडांची खोडं फक्त ठळकपणे दिसू लागली; जणू ‘निसर्गाचे विद्रुपीकरण कशाला म्हणतात,’ हे सोदाहरण दाखवून देण्यासाठीच ही कत्तल केली असावी, असे कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला वाटल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा विद्युत तारांलगतच्या फांद्या-झाडे छाटली जातात, तेव्हा प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने झाडे छाटली जातात. एकीकडे वायू प्रदूषण, कार्बन शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याची फार मोठी गरज असताना, फार कमी ठिकाणी दुतर्फा झाडे असल्याचे दुर्दैवाने दिसून येते. त्याच वेळी जिथे थोडी बहुत झाडे आहेत, तिथे अशा पद्धतीने बेसुमार कत्तल होते.

विद्युत तारा मोकळ्या करण्यासाठी फांद्या तोडताना अजिबात तारतम्य ठेवले जात नाही आणि त्यासाठी काही नियमावलीही दिसत नाही. जेवढी मोठी फांदी तेवढा जास्त ‘माल’ मिळतो म्हणून मोठमोठ्या फांद्या तोडल्या जातात, असाही आरोप केला जातो. त्यामुळे आधीच शहर परिसरात असलेले साडेतीन टक्के झाडांचे प्रमाण दिवसेंदिवस आणखी कमी-कमी होत आहे. मराठवाड्यात तर सरासरी दोन टक्केच झाडांचे प्रमाण असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. पुन्हा आपल्याकडे लावली जाणारी झाडे ही सर्वाधिक प्रमाणात शोभेची किंवा फुलांची किंवा विदेशी असतात, जी वादळ-वाऱ्यात व निसर्ग चक्रात टिकत नाहीत. त्यामुळे देशी झाडे लावण्यात कमीपणा वाटतो का कमी ‘मलिदा’ लाटता येतो म्हणून देशी झाडे टाळली जातात, हाही प्रश्नच आहे. त्याच वेळी झाडे कुठे लावावीत, कोणती लावावीत व कधी लावावीत, याचेही भान ठेवले जात नाही. यामुळेही अनेक झाडांची एकतर कत्तल होते, नाहीतर तारांना घर्षण होऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याचा उद्योग दिवस-रात्र सुरुच असतो.

खरे म्हणजे भूमिगत विद्युतपुरवठ्यामुळे या एकूणच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. पुणे-मुंबईसह इतरही अनेक ठिकाणी अशा पद्धतीने भूमिगत तारांमधून विद्युतपुरवठा होत आहे. त्यामुळे तारांना घर्षण होऊन किंवा झाड-फांदी पडून वर्षभरात शेकडो वेळा खंडित होणारा विद्युतपुरवठा टाळता येऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे याच विद्युत तारांसाठी दर पर्षी होणारी शेकडो झाडांची व मोठमोठ्या फांद्यांची कत्तलही टाळता येऊ शकते. परिणामी, शहर सुंदर व हिरवेगार होण्यासाठी मोठा हातभार लागू शकतो.

याच भूमिगत विद्युतपुरवठ्यासाठी कदाचित मोठा खर्च लागू शकतो; परंतु शेकडो कोटी खर्चून समृद्धी महामार्ग व किती तरी महामार्ग तयार होत असताना तुलनेने कमी खर्चातील भूमिगत विद्युत पुरवठ्याच्या योजनेवर खर्च करणे चुकीचे म्हणता येणार नाही. पर्यटनाची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराची ही तर फार मोठी गरज आहे आणि एव्हाना या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. पर्यटनाची राजधानी ही स्वच्छ, सुंदर, निटनेटकी व हिरवीगार असणे तितकेच महत्त्वाचे आहे. खरे म्हणजे हळूहळू संपूर्ण राज्यात याच पद्धतीने भूमिगत विद्युतपुरवठा योजनेची अंमलबजावणी होणे ही आधुनिक काळाची गरज आहे. निवडणुकांमध्ये पार मश्गुल झालेले भावी लोकप्रतिनिधी अशा लोकोपयोगी योजनांचा आता तरी विचार करणार आहेत की नाही, यावर सामान्यांचा त्रास कमी होणार आहे की नाही, हे अवलंबून आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-04T11:17:38Z dg43tfdfdgfd