अवघे पदपथ व्यापलेले

केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात आल्यावरच पदपथ फेरीवालामुक्त होणार का, सामान्यांची काही कदर आहे की नाही, असा अगदी रास्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेस विचारला आहे. खरेतर उच्च न्यायालयाने समस्त नागरिकांच्या मनांतील संतप्त भावनांनाच या फटकाऱ्यातून वाट मोकळी करून दिली आहे. कायदे, नियम धाब्यावर बसवून कोणत्याही रस्ते-पदपथावर आपले बेकायदा दुकान थाटा, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरजोराने गोंगाट करा, झगमगाट करा, लोकांच्या अंगावर खेकसा हे सारे प्रकार महामुंबईत तर नेहमीचेच झाले आहेत. आता तर इतर शहरांमधील पदपथांनाही याच व्याधीने विळखा घातला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाला-ना फेरीवाला भागांची रचना करण्याची, रेल्वे स्थानके फेरीवालामुक्त ठेवण्याची तसेच फेरीवाल्यांची नोंदणी करण्याची योजना निर्देशित केली त्यास १२ वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. परंतु कोणत्याही महापालिकेच्या हद्दीत हे काम पुढे सरकलेले नाही.

मुंबई महापालिका मुख्यालय, मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि मुंबई पोलिसांचे मुख्यालय या तीन महत्त्वाच्या आस्थापना दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहेत. या मुख्यालयांना खेटूनच पादचारी भुयारी मार्ग व सतत गजबजणारे रस्ते, पदपथ आहेत; परंतु तेथेही फेरीवाल्यांनी कब्जा घेतलेला आहे. या फेरीवाल्यांना राजरोसपणे वीजपुरवठाही मिळतो. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आपल्या मुख्यालयाखालच्या भुयारी मार्गातील बजबजपुरीही दिसत नसेल, तर इतर महापालिकांकडून फार काही अपेक्षाच करायला नको. यादृष्टीने मुंबई हे नावापुरतेच आंतरराष्ट्रीय शहर म्हणायचे. ठाण्यात काही परिसरात फेरीवाले इतके शिरजोर झाले आहेत, की त्यांनी महापालिका आयुक्तांपासून ते सहायक आयुक्तांपर्यंत अनेकांना जीवघेणी मारहाण केल्याचे प्रसंग घडले आहेत. एका सहायक आयुक्तांना तर त्यात हाताची बोटे गमवावी लागली.

आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर हल्ले होऊनही फेरीवाल्यांना वेसण घालण्याची गरज महापालिकांना वाटत नाही, हे गंभीर आहे. अतिक्रमणविरोधी पथकांच्या कारवाया आजवर अल्पजीवीच ठरल्या आहेत व ही पथकेच कित्येकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. पादचारीच फेरीवाल्यांकडून खरेदी करतात, असा युक्तिवादही महापालिकांकडून केला जातो. हा युक्तिवाद म्हणजे केवळ जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. रीतसर करभऱणा करून दुकाने घेतलेल्या दुकानदारांपुढे फेरीवाले येणे म्हणजे नियम पाळणाऱ्यांच्या उत्पन्नावर डल्ला मारण्यासारखेच. कष्ट करून कमी भांडवलात किरकोळ विक्रीचा व्यवसाय करणे ही कष्टकऱ्यांची गरज असेल, तरी ते नियमांत राहूनच करायला हवे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-26T19:10:21Z dg43tfdfdgfd