MUMBAI LOCAL TRAINS : आजचा अग्रलेख - घोषणांचाही पाऊस

रेल्वे हा भारतातील सर्वांत मोठा उद्योग आहे. मुंबईसाठी तर उपनगरी रेल्वेसेवा हा श्वासच आहे. असे असूनही केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प रद्द केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुख्य अर्थसंकल्पात रेल्वेच्या नव्या गाड्या, आर्थिक तरतूद, नवे प्रकल्प यांना फारसा स्पर्शही केला नाही. एकीकडे बिहार आणि आंध्र प्रदेश यांच्यावर धनवर्षाव होत असताना महाराष्ट्राला आणि खासकरून रेल्वेला काय मिळाले, हे नागरिकांना कळायला मार्ग नव्हता. यावर उपाय म्हणून दुसऱ्या दिवशी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणांचा पाऊस पाडला. त्यातील उपगरी रेल्वेसेवेच्या आणखी २५० फेऱ्या वाढणार, हा आकडा प्रथमदर्शनी भारदस्त वाटला तरी पुढच्या पाच वर्षांसाठीचे हे लक्ष्य आहे.

तीच गोष्ट महामुंबईत आणि महाराष्ट्रात होणाऱ्या नव्या टर्मिनलची. परळ येथील रेल्वेच्या विशाल भूखंडावर महास्थानक किंवा टर्मिनल होणार, हे ऐकत ऐकत मुंबईकरांच्या दोन पिढ्यांनी लोकलला लटकत आपला प्रवास पुरा केला आहे. महामुंबईत रेल्वे, मेट्रो, बस, मोनो रेल यांचा समन्वित विचार करून जे काम व्हायला हवे होते, ते आजही झालेले नाही. मुंबईतील मोनो रेलचा प्रकल्प तर पूर्णपणे फसला आहे. चर्चगेट ते विरार यांच्या दरम्यान सध्याच्या रेल्वेमार्गावर दुसरा मार्ग बांधायचा, हे स्वप्न तर दोन दशके खेळविले गेले. या योजनेचा तांत्रिक अहवालही तयार झाला. मुंबईची कुरुपता आणि गर्दी वाढविणारा हा प्रकल्प होता. शेवटी तो पीयूष गोयल रेल्वेमंत्री असताना रद्द झाला आणि मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

सध्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे कार्यक्षम आणि तंत्रकुशल समजले जातात. एका भीषण रेल्वे अपघातानंतर ७२ तास उभे राहून त्यांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली. मात्र, ही कार्यक्षमता मुंबईच्या वाट्याला का येत नसावी? मुंबईत सन २०२३ मध्ये उपनगरी स्थानकांवर दोन हजार सहाशे प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. यातील बरेच भरगच्च भरलेल्या गाड्यांमधून पडून मरण पावले तर काही रुळांवर आल्यामुळे. महामुंबईचा परिसर आजही फाटकमुक्त झालेला नाही. जितके प्रवासी प्राणांस मुकतात, त्याच्या किमान दुप्पट जखमी होतात. सध्या दोन गाड्यांमध्ये असणारे १८० सेकंद म्हणजे तीन मिनिटांचे अंतर केवळ कागदोपत्री आहे. वर्षभरात किमान ५० प्रसंग असे येतात की जेव्हा प्रवासी गाडीसाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ खोळंबतात. उद्या दोन गाड्यांमधले अंतर १५० सेकंद झाले आणि ते खरोखरच प्रत्यक्षात आले तर दर अडीच मिनिटांनी स्थानकांमध्ये येऊन आदळणारे गर्दीचे लोंढे पेलण्याची क्षमता ना स्थानकांची आहे; ना जिन्यांची किंवा सध्याच्या सरकत्या जिन्यांची. काही वर्षांपूर्वी अनेक निरपराध जीव प्राणास मुकल्यावर परळ स्थानकात चार कामे झाली. मात्र, आजही कुर्ला, घाटकोपर, ठाणे, विरार, कल्याण आदी स्थानके अनावर गर्दीचा सामना करीतच आहेत.

मुंबईतील मेट्रोच्या कामाला अक्षम्य विलंब झाला आहे. त्याचा दोष राजकीय साठमारीवरही जातो. आजही हे वेळापत्रक रुळावर आलेले नाही. रोजचा प्रवास असह्य झालेल्या मुंबईला ‘बुलेट ट्रेन’ची खरेच गरज आहे का, याचा गंभीर विचारही कुणी केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरील नव्या, वाढीव फलाटांचे उद्घाटन केले. मात्र, एलटीटी येथे आणखी चार नवे फलाट या आधीच व्हायला हवे होते. ते आता होतील, असे वैष्णव म्हणाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे खात्याने मोठ्या स्थानकांवर प्रचंड बांधकामे केली आहेत. नवे जिने किंवा विस्तीर्ण कॉरिडॉर बांधले आहेत. मात्र, ते प्रवाशांच्या सोयीचे आहेत का किंवा ते वापरले जातात का, याचा काही विचार होत नाही. आज असे कित्येक वापरले न जाणारे जिने किंवा कॉरिडॉर भलत्याच गोष्टींसाठी वापरले जातात. महामुंबईच्या उपनगरी रेल्वेसेवेसाठी एक स्वतंत्र विभाग करावा, अशी सूचना मागेच आली होती. ती आजही अमलात आलेली नाही. पश्चिम आणि मध्य रेल्वे यांच्यातील समन्वयाचा अभाव हाही अनेकदा मुंबईकरांना वाढता त्रास सोसायला लावतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा निधी यंदा महाराष्ट्रासाठी राखून ठेवला आहे; असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. मात्र, या निधीचे रूपांतर कामात होणे आणि त्या कामांचा अनुभव रोजच्या प्रवासात येणे, हे महामुंबईत अजूनतरी स्वप्नच आहे. उपगरी रेल्वेसेवेचा वापर करणारे ८० लाख मुंबईकर देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात मोठी भर घालत असतात. त्यांचा प्रवास सुखकर, सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी केवळ रेल्वेच नव्हे तर सर्वच यंत्रणांनी एकत्र येऊन युद्ध पातळीवर काम करण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी नगर नियोजन, घरबांधणी आणि सर्व वाहतूक सुविधांच्या समन्वयापर्यंत नव्या दृष्टीने चौफेर काम करावे लागेल. ते कधी होईल?

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-26T06:00:32Z dg43tfdfdgfd