MAMTA BANERJEE : ते सगळं खोटं, ममता बॅनर्जींच्या आरोपाला सीतारामन यांचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : नीती आयोगाची नववी गव्हर्निंग कौन्सिल (GC) बैठक शनिवार (27 जुलै )रोजी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पार पडली. या बैठकीतून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज होऊन बाहेर पडल्या आहेत. बैठकीत मुद्दा नीट मांडून दिला नाही तसेच बोलण्यासाठी वेळ फार कमी दिला अशी संतप्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावले आहेत.

निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?

निर्मला सीतारामन यांनी ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या की, ''पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्यांचे म्हणणे एकले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आणि ते सर्व टेबलांसमोर ठेवलेल्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. मात्र सभेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपला माईक बंद असल्याचे माध्यमांना सांगितले. हे पूर्णपणे खोटे आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. असे असतानाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा दुर्दैवी आहे. त्यांनी यामागील सत्य सांगावे आणि पुन्हा खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करू नये''.

ममता यांचा आरोप काय होता ?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “माझा माईक पाच मिनिटांतच बंद करण्यात आला, तर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 15 ते 20 मिनिटांचा वेळ देण्यात आला. चंद्राबाबू नायडूंना बोलण्यासाठी 20 मिनिटे देण्यात आली, आसाम, गोवा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 10-12 मिनिटे बोलले. परंतु मला अवघ्या पाच मिनिटांचा वेळ दिला नंतर थांबवण्यात आलं. हे चुकीचे आहे. विरोधी पक्षाकडून मी एकटीच सहभागी झाले होते. पण त्यांनी मला अवघ्या 5 मिनिटांत रोखले. हा माझा अपमान आहे. मी आता अशा कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही. कोणतेही सरकार असे काम करत नाही आणि जेव्हा सरकार सत्तेवर असते तेव्हा त्याला सर्वांची काळजी घ्यावी लागते''.

दरम्यान, या बैठकीवर इंडिया आघाडीच्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. यामध्ये तामिळनाडूचे एम. स्टॅलिन (डीएमके), केरळचे पिनाराई विजयन (सीपीआय-एम), पंजाबचे भागवंत मान (आप) कर्नाटकचे सिद्धरामय्या, हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंग सुखू आणि तेलंगणाचे रेवंथ रेड्डी यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्यामागे अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचे कारण दिलं आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-27T11:14:05Z dg43tfdfdgfd