CIRCLES OF FREEDOM BOOK REVIEW: सर्कल्स ऑफ फ्रीडम; 'स्वातंत्र्यलढ्याची प्रभावी मांडणी'

जतीन देसाई

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले आणि एकमेकांचे चांगले पाच मित्र, त्यांची वाटचाल आणि त्यातून उलगडणारा स्वातंत्र्याचा इतिहास मुत्सद्दी-इतिहासकार टी. सी. ए. राघवन यांनी त्यांच्या ‘सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल’ या पुस्तकात मांडला आहे. असफ अली, सरोजिनी नायडू, सय्यद हुसेन, सय्यद मेहमूद आणि अरुणा असफ अली हे मित्र होते. यांच्याभोवती स्वातंत्र्याच्या आंदोलनाची प्रभावी मांडणी या पुस्तकात आहे.

मुंबईच्या गोवालिया टँक येथे पोलिसांची भीती न बाळगता ९ ऑगस्ट, १९४२ रोजी भारताचा राष्ट्रध्वज अरुणा यांनी फडकवला, तेव्हा त्या देशाच्या नायिका झाल्या. सकाळी पती असफ, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू व काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक करून अहमदनगरला नेताना अरुणा यांनी व्हीट (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्टेशनवर पाहिले. नगरच्या किल्ला तुरुंगात असफ यांच्याव्यतिरिक्त नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, शंकरराव देव यांच्यासह एकूण १२ जण होते. त्यांना १९४५च्या जूनमध्ये सोडण्यात आले. २१ ऑगस्टला व्हॉइसरॉय वेव्हेल यांनी केंद्रीय आणि प्रांतीय असेंब्लीच्या निवडणुका जाहीर केल्या. असफ यांची दिल्लीहून केंद्रीय असेंब्लीत निवड करण्यात आली. मुस्लिम लीगने तिथून उमेदवार उभा केला नव्हता, पण असफ यांच्या विरोधात एका मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा दिला. मात्र, असफ यांचा विजय झाला.

१९४५मध्ये ब्रिटनमध्ये लेबर पार्टी सत्तेत आली. नेमक्या याच वेळी आझाद हिंद फौजेच्या तीन जवानांवर दिल्लीत लाल किल्ला येथे खटला चालविण्याचा निर्णय झाला. आपण कुठल्या एका धर्माच्या विरोधात नसल्याचे दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी शहानवाज खान, प्रेमकुमार सेहगल आणि गुरुबक्षसिंग ढिल्लोन यांच्यावर खटला चालवला. तेव्हा भारताच्या घराघरांत पोहोचलेली घोषणा म्हणजे ‘लाल किल्लेसे आई आवाज; सेहगल, धिल्लोन, शहानवाज.’ तिन्ही धर्मांतील लोकांवर खटला भरण्याच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण भारत उभा राहिला.

काँग्रेस महासमितीची २१-२२ सप्टेंबर १९४५ रोजी गोवालिया टँक येथे बैठक झाली आणि काँग्रेसने संपूर्ण ताकदीने आझाद हिंद फौजेच्या जवानांचा बचाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बचाव समिती स्थापण्यात आली. त्यात नेहरू, तेजबहादूर सप्रू व भुलाभाई देसाई होते. असफ त्या समितीचे संयोजक होते. प्रसिद्ध वकील भुलाभाई देसाई यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी कमांडर इन चीफ अचिलनेक यांनी शिक्षा माफ केली. भारतीयांचा हा मोठा विजय होता.

असफ आणि अरुणा यांचे लग्न १९२८मध्ये झाले होते. हिंदू-मुस्लिम लग्न असल्यामुळे काहींनी त्याला विरोध केला. सेंट्रल असेंब्लीत होणाऱ्या चर्चा ऐकण्यासाठी अरुणाही असफ यांच्यासोबत बऱ्याचदा जात. आठ एप्रिल, १९२९ रोजी असफ यांच्यासोबत अरुणा गेल्या असता स्वातंत्र्य आंदोलनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली. स्पीकर विठ्ठलभाई पटेल हे एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार होते. त्याच क्षणी मोठा आवाज आला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी टाकलेल्या दोन बॉम्बचा तो आवाज होता. राघवन म्हणतात, त्या दिवशी अरुणाने पहिल्यांदा ‘इन्कलाब जिंदाबाद’ ही हसरत मोहानी यांनी १९२१मध्ये बनवलेली घोषणा ऐकली. नंतर अरुणा काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या.

९ ऑगस्ट १९४२च्या पराक्रमामुळे देशाने अरुणा यांचे कौतुक केले. नंतर त्या भूमिगत झाल्या. डाव्या विचाराचा त्यांच्यावर प्रभाव होता. मात्र, असफ आणि अरुणा यांचे मतभेद वाढत होते. असफ यांचा सनदशीर मार्गाचा आग्रह, तर अरुणा यांचा भर आंदोलनावर. १९४६च्या मे महिन्याच्या शेवटी असफ यांना मुक्त करण्यात आले. अरुणा यांनी रुग्णालयात असफची भेट घेतली. तीन वर्षांनी ते भेटले होते. १९४५मध्ये काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद यांनी अरुणा यांची तब्येत चांगली नसून त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द करण्याची आणि माफी देण्याची मागणी व्हॉइसरॉय यांच्याकडे केली होती. त्यांनी आझाद यांना ‘अरुणाने हिंसक कृत्यांना मदत केल्यामुळे वॉरंट रद्द करता येणार नाही,’ असे कळवले. अरुणा यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. १९४६च्या जानेवारीत वॉरंट रद्द झाले. या सर्वांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील अशा योगदानाचा मागोवा या पुस्तकात आहे.

सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल

लेखक : टी. सी. ए. राघवन

प्रकाशक : जगरनॉट

पाने : ३९८, किंमत: ७९९ रुपये

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-07T07:50:14Z dg43tfdfdgfd