ARVIND KEJRIWAL : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, २०१३ च्या पॅटर्ननुसार अरविंद केजरीवाल पुन्हा यशस्वी होणार?

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे का? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा हा निर्णय 2025 मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे दिली जात आहेत.

दिल्लीत 10 वर्षांपासून 'आप'चे सरकार असून, यावेळी पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो, असे मानले जात आहे. तसेच, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) देखील आप सोबत आहे, त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत पूर, डेंग्यूसारख्या आजारांचा उद्रेक, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांची दुरवस्था या समस्या सुटलेल्या नाहीत. या मुद्द्यांमुळे 'आप'चे शिक्षण आणि आरोग्य मॉडेलही ढासळत चालले आहे.

केजरीवाल यांचा निर्णय प्रशासकीय की निव्वळ राजकीय ?

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस यावेळीसुद्धा पूर्ण ताकदीने दिल्लीच्या निवडणुकीत उतरणार आहे. तर भाजप दिल्लीतील सर्व लोकसभा जागा जिंकून पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जाते. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर केजरीवाल यांनी जनतेशी थेट संवाद साधत म्हणाले की, ''जर तुम्हाला मी निर्दोष वाटत असेल तर मला मत द्या''. 'आप'ने या निर्णयाला पारदर्शकतेचे पाऊल म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना घातलेल्या अटींमुळे त्यांना सरकार चालवणेही कठीण होत होते. मात्र, कायदेशीर सल्ल्याने ते या अडचणींवर मात करू शकले. यावरून हा निर्णय प्रशासकीय नसून पूर्णपणे राजकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हरियाणा आणि विशेषतः दिल्लीच्या निवडणुका या पक्षासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

2013 पॅटर्न 2025 मध्ये प्रभावी ठरणार का?

दरम्यान, केजरीवाल यांनी 2013 मध्ये भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. आणि आता सुद्धा त्यांना त्याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या राजीनाम्याद्वारे त्यांनी लोकांना एकप्रकारे 2013 ची आठवण करून दिली आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांची ही रणनीती 2025 च्या निवडणुकीत कितपत प्रभावी ठरते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तसेच दिल्लीतील जनता पुन्हा एकदा 'आप'ला संधी देणार का? हे फक्त येणारी वेळच सांगू शकेल. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न निर्माण जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-16T17:41:41Z dg43tfdfdgfd