SPERM BANK MUMBAI : मुंबईत अचानक बंद होऊ लागल्या स्पर्म बँका; सरकारची एक अट ठरली कारणीभूत

मुंबई : सरोगसी प्रक्रियेसंदर्भातील अधिक कडक करण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका आता शहरातील शुक्राणूजतन करणाऱ्या (स्पर्म) बँकांनाही बसला असून बहुतांश बँका बंद झाल्या आहेत. आधारच्या सक्तीमुळे दात्यांनी या बँकांकडे पाठ फिरवली असून गोपनीयता राखली जाणार नाही हे कारण देत शुक्राणूदान करण्यासाठी आता दाते पुढे येत नाहीत. परिणामी वंध्यत्वनिवारणासाठी ज्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता तो यापुढे करता येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहा ते बारा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये शुक्राणू जतन करणाऱ्या बँका सुरू झाल्या. वंध्यत्वनिवारणाच्या प्रक्रियेतील वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये फलनासाठी गरजेचे असलेले पुरुषबीज या माध्यमातून घेतले जात होते. दात्यांना त्यासाठी आर्थिक मोबदला दिला जात होता. शुक्राणू दान करणाऱ्या दात्याच्या संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नव्हती. आता या नव्या निर्देशांमुळे त्यात गोपनीयतेचा निकष पाळला जाणार नाही अशी भीती दात्यांना वाटते. या कारणामुळेच शुक्राणू दान करण्यासाठी पुढे येणाऱ्या दात्यांची संख्या वेगाने घटली आहे. आयईयू, आयव्हीएफ तसेच सरोगसी या तिन्ही प्रकारच्या वंध्यत्वनिवारणासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीमध्ये गरज असेल तिथे दात्यांकडून शुक्राणूची उपलब्धता घेतली जात होती. या बँकांमध्ये येणाऱ्या तरुण दात्यांची संख्या सर्वाधिक होती. आता त्यात घट झाल्याने या बँकांच्या उद्दिष्टाची परिपूर्ती होत नाही. त्यामुळे हा निर्णय़ घेतल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

सरोगसी प्रक्रियेतील नव्या नियमांमुळे तसेच कायद्यामध्ये आणलेल्या नियमावलीमुळे अद्याप संदिग्धता आहे. सरोगसी कुणी करावी हे स्पष्ट झालेले नाही. दात्यांना केवळ एकदाच शुक्राणूदान करता येणार आहे. यापूर्वी हे दान कितीवेळा करावे यासाठी मर्यादा नव्हती. या बँकांनी कोणत्या वैद्यकीय नियमांचे पालन करावे यासंदर्भात अद्याप सुस्पष्टता नसल्याने सरकारी कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा बँक बंद करण्याचा निर्णय घेण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. आधार कार्डची जोडणी करायला सांगितल्यामुळे गोपनीयता कायम राहणार नाही ही धास्ती दात्यांमध्ये सर्वाधिक असल्याचे जीवदानी सायन्टिफिक सेंटरच्या मयूर संख्ये यांनी सांगितले.

दुर्धर आजार असलेल्यांना फटका

कॅन्सरसह इतर गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे मूल होऊ देण्याचा निर्णय़ घेता येत नाही. वैद्यकीय गुंतागुंत टाळण्यासाठी शुक्राणूदान करून ते या बँकेमध्ये सुरक्षित जतन करून ठेवले जाते. गरज असताना ते वापरले जातात. या बँका बंद झाल्याचा फटका या गरजू रुग्णांनाही बसणार आहे. शुक्राणू बँक बंद करताना जतन करण्यात आलेले नमुने काही बँकांनी फेकून दिले आहेत. करोना संसर्गानंतर वंध्यत्वाच्या, शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी वाढल्या होत्या. अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या अशा जोडप्यांनाही या शुक्राणूबँकांचा आधार होता.

व्यवस्थापनाचा खर्च अधिक

उणे १९७ डिग्री तापमानाला द्रवरूपी नायट्रोजनमध्ये दान केलेल्या शुक्राणूचे जतन करावे लागते. कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या डॉक्टरांकडून त्याची मागणी झाल्यानंतर ते देण्यात येते. या बँकांमध्ये वैद्यकीय व्यवस्थापनाचा खर्च हा लाखो रुपयांच्या घरात असतो. या निर्बंधांमुळे दातेच येणार नसतील तर हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न डॉ. जी. व्ही. पाटील यांनी उपस्थित केला.

2023-06-01T05:18:27Z dg43tfdfdgfd