Sant Gorobakaka: महाराष्ट्रातील संत परंपरा खूप प्रगल्भ आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला अनेक महान संत दिले. त्यातील एक म्हणजे संत गोरोबाकाका कुंभार. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत म्हणून गोरोबाकाकांची ओळख आहे. अशा या महान संताची 6 मे रोजी पुण्यतिथी आहे. आपले दैनंदिन काम करत असताना गोरोबा काकांनी आपला अभ्यास, चिंतन आणि अभंगरचना करणे सुरूच ठेवले होते. त्यांनी केलेल्या अभंगरचनांपैकी सध्या काही अभंग उपलब्ध आहेत. त्यांपैकी 15 अभंगांमध्ये संत नामदेवांशी संवाद आहे. तर काही अभंगात सगुण विठ्ठलाचा गौरव आहे. संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बंका, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत निळोबा आदी संतांनी गोरोबांचा महिमा आपल्या अभंगांतून गायला आहे.
सन 1267 साली उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर गावी एका कुंभार कुटुंबात संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. तेर गावातील हे कुंभार कुटुंब धार्मिक आणि सदाचारी म्हणून परिचित होते. येथील काळेश्वर ग्रामदैवताचे ते उपासक होते. तसेच घरात पंढरपूरच्या विठ्ठलाचीही भक्ती होती. गोरोबाकाका यांचे वडिल हे विठ्ठलाचे भक्त होते. वडिलांच्या सांगण्यानुसार गोरोबांनी पंढरपूरची वारी सुरू केली. आणि ते पुर्णपणे विठ्ठल भक्तीत मग्न झाले. पंढरपूरच्या वारी दरम्यान, गोरोबा काक यांची भेट संत नामदेव आणि इतर समकालीन संतांसोबत झाली.
संत गोरोबा कुंभार यांच्या संदर्भात प्रचलित एका कथेनुसार, संत गोरोबाकाका हे एकदा मडकी घडविण्यासाठी अवश्यक चिखल पायाने तुडवीत असताना ते विठ्ठलनामात दंग झाले. दरम्यान, गोरोबांनी स्वतःच्या बाळाला त्या चिखलात पायाखाली तुडविले. त्यावेळच्या प्रसंगात गोरोबा रागात पत्नीला मारायला धावले तर गोरोबा काकांच्या पत्नीने त्यांना 'मला हात लावाल, तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ' अशी शपथ घातली. त्यानंतर काही दिवसांनी गोरोबांचा चुकून आपल्या पत्नीला स्पर्श झाला. यामुळे पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून गोरोबांनी कोपरापासून स्वतःचे हात तोडून घेतले. त्यानंतर, गोरोबा अपंग झाल्यामुळे विठ्ठल, रुक्मिणी आणि गरुड सामान्य माणसाच्या रूपात गोरोबांच्या घरी आले आणि ते संत गोरोबाला कुंभारकामत मदत करू लागले. गोरोबा एके दिवशी संत नामदेवांच्या कीर्तनात असताना नामस्मरणात तल्लीन होऊन टाळ्या वाजविण्यासाठी त्यांनी आपले थोटे हात वर केले असता, त्यांना पुन्हा कोपरापासून हात फुटले. ऐवढेच नाही तर त्यांचा मुलगाही जिवंत होऊन परत आला.
शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला (20 एप्रिल 1317) गोरोबा काकांनी आपल्या गावी म्हणजे तेर येथे तेरणा नदीच्या उत्तर काठावर समाधी घेतली.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Marathi Times Now News या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)
2024-05-03T11:45:40Z dg43tfdfdgfd