LOK SABHA ELECTIONS 2024: राहुल गांधी वायनाडनंतर आता या मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असताना कॉंग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघावर निर्माण झालेला सस्पेंस आता संपला आहे. पक्षाने राहुल गांधींना रायबरेलीतून तर के. एल शर्मा (किशोरीलाल शर्मा) यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर केली आहे. प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असलल्याची माहिती समोर आली होती मात्र आता याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी आज रायबरेली येथे पोहोचणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपने दिनेश सिंह यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.

याआधी राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2019 पर्यंत राहुल सलग तीन वेळा ते खासदार राहिले होते. 2014 आणि 2019 मध्ये, अमेठी मतदारसंघात राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात लढत झाली होती. 2014 मध्ये राहुल यांचा विजय झाला होता. तर 2019 मध्ये स्मृती इराणींनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसने राहुल गांधींऐवजी अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना मैदानात उतरवले आहे.

राहुल सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत आणि यावेळीही त्यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली आहे. तेथे दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. 2019 साली रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी विजय मिळवला होता. आता या जागेवर राहुल यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे 2 मतदारसंधांमधून खासदार होण्याची संधी आता राहुल गांधींकडे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही जागा सुरुवातीपासून गांधी-नेहरू घराण्यातील सदस्यांकडे आहेत. मात्र आता पक्षाने पहिल्यांदाच अमेठीतून गांधी कुटुंबातील सदस्याव्यतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कारणामुळे रायबरेलीची जागा महत्वाची

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ एका जागेवर विजय मिळाला होता, ती जागा म्हणजे रायबरेलीची जागा. या मतदारसंघातून सोनिया गांधी यांचा विजय झाला होता. सोनिया गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. 20219 मध्ये त्यांनी ही त्यांची शेवटची लोकसभा निवडणूक आहे अशी घोषणा केली होती. 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवत सलग 4 वेळा निवडून आल्या होत्या.

2024-05-03T03:28:04Z dg43tfdfdgfd