Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting Percent Till 5 pm: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडले आहे. सांयकाळी 5 वाजता मतदानप्रक्रिया संपली आहे. देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 मतदारसंघांमध्ये ही तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात 120 महिलांसह 1,300 हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ताज्या अपडेटनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात देशात 60.2% टक्के मतदान झाले आहे, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील 26, कर्नाटकातील 14, महाराष्ट्रातील 11, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8, छत्तीसगडमधील 7, बिहारमधील 5, आसाममधील 4, पश्चिम बंगालमधील 4 आणि गोव्यातील 2 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या 2 मतदारसंघात देखील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान एकूण सात टप्प्यांत होत आहेत. 1 जून रोजी अखेरच्या टप्पातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर देशाला नवे पंचवार्षीक सरकार मिळणार आहे.
सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात होऊन सायंकाळी 5 वाजता मतदान संपेल. या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, माढा, लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासह देशात बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले हे जाणून घ्या.