बुलढाणा : आषाढी वारीसाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रींच्या दर्शनासाठी भाविक हे संतनगरीमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. 'गण गण गणात बोते'च्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता. जवळपास ७५० किलोमीटरचा प्रवास ३० ते ३१ दिवसांमध्ये वारकरी 'गण गण गणात बोते' नामाचा जप करत पूर्ण करणार आहेत. आषाढी एकादशीनंतर पुन्हा एकदा ही पालखी पंढरपुरातून शेगावकडे प्रस्थान करणार आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी २६ मे रोजी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार यंदाही ज्येष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाच्या निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.
सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी करतात. सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेशात, शिस्तीत टाळ मृदंगाच्या निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान करणार
आहे.
कसं असेल नियोजन?
श्री संत गजानन महाराजांची पालखी २७ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच २७ जून ते २ जुलैपर्यंत मुक्काम राहणार आहे. ३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे आणि २३ जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर २४ जुलै रोजी सोमवारी ही पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे.
दरम्यान, ही दिंडी पाच जिल्ह्यांतून जाणार असून तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे.
2023-05-26T07:46:20Z dg43tfdfdgfd