हिमालयाच्या कुशीतील होरपळ

-सोनिया नारकर

उत्तराखंड राज्य ओळखले जाते ते हिमालय पर्वतरांग, शिवालिक टेकड्यांसाठी. बहुतांश डोंगराळ भाग असलेल्या या राज्यात एकूण क्षेत्रफळापैकी ४५ टक्के वनक्षेत्र आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या ‘भारतातील वनांची स्थिती’ या ताज्या अहवालाने ही आकडेवारी दिली आहे. भारतातील सरासरी वनक्षेत्र सुमारे २२ टक्के आहे. त्या तुलनेत उत्तराखंडमधील वनाच्छादनाचे महत्त्व लक्षात यावे.

मागील आठवड्यात उत्तराखंडमध्ये वनांना भीषण वणव्यांची झळ बसली. चंपावत, अल्मोडा, पिठोरागढ, बागेश्वर, रुद्रप्रयागसह पर्यटकप्रिय नैनिताल जिल्ह्यातील वनांची राख झाली. नैनितालमध्ये या झळा शहरी वस्तीजवळ पोहोचल्याने हवाई दलाच्या विमानांद्वारे ‘बांबी बकेट’ तंत्राने दोन दिवस ज्वाळांवर पाण्याचा मारा करावा लागला, लष्करी जवानांना पाचारण करण्याची आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याची वेळ आली. राळ कारखान्यातील तीन मजुरांना आगीचा सामना करताना प्राणही गमावावे लागले. जंगलतोड रोखण्यासाठी वनांना मिठ्या मारणाऱ्या या भूमीतील पहाडीजनांना वनांची ही राखरांगोळी आपल्या डोळ्यांनी पाहावी लागत आहे.

वास्तविक, हिमालयाच्या टेकड्यांच्या प्रदेशात असलेल्या या भागाला वणवे नवीन नाहीत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या मते, भारतातील ३६ टक्के वने ही वारंवार वणवे लागण्याचा धोका असलेली आहेत. मार्च, एप्रिल, मेमध्ये वाढते तापमान आणि गळलेला कोरडा पालापाचोळा हे घटक आगीला कारणीभूत ठरतात. यंदा या घटना वाढल्याचे दिसते. दीर्घकाळ कोरडे वातावरण हा यातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगण्यात येते. यंदा उत्तराखंडमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिल्याने मृदेमध्ये, पानांमध्ये ओलावा कमी आहे. यात वाढत्या तापमानाची भर पडल्याने वणवे चटकन भडकत आहेत. कुमाऊ या विभागातील नैनिताल, उधम सिंह नगर, अल्मोडा, पिठोरागढ, बागेश्वर, चंपावत या सहाही जिल्ह्यांमध्ये एप्रिलमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट ९० टक्के एवढी आहे. नैनितालमध्ये तर ही तूट ९९ टक्के आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगने (आयआयआरएस) या मुद्द्यावर भर दिला आहे. ‘गतवर्षाच्या तुलनेत यंदा १ फेब्रुवारीपासून वणव्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. कुमाऊ भागात हे प्रमाण अधिक आहे. नैनिताल जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत पाच पट अधिक वणवे लागले आहेत. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. मात्र यंदा मार्च महिन्यातील दीर्घकाळ कोरडा गेला आहे. त्यातच मार्चमध्ये तापमान वाढले. त्यामुळे मृदेमधील ओलावा कमी झाला, तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारा पालापाचोळाही कोरडा पडला आहे,’ याकडे ‘आयआयआरएस’ने लक्ष वेधले आहे. आधीच कोरडे वातावरण असताना, उन्हाच्या झळांनी परिस्थिती भट्टीसारखी झाली आहे .

हिमालयाच्या क्षेत्रातील पाइन वृक्षांविषयी ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ आणि निवृत्त वनाधिकारी डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी अधिक माहिती दिली. ‘समशीतोष्ण (टेम्परेट) हवामानातील पाइन वृक्षांमध्ये रेझीन्स (राळ) हा तेलकट, अत्यंत ज्वलनशील घटक असतो. या झाडांना चीर मारून रेझीन्स काढून व्यावसायिक तत्त्वावर टर्पेंटाइनची निर्मिती केली जाते, यावरून त्याची ज्वलनशीलता लक्षात यावी. अन्य झाडांमध्ये असलेले डिंक, मध, मेण हे अकार्बनिक प्रकारच्या पदार्थात मोडतात, तर रेझिन हे कार्बनिक प्रकारच्या पदार्थात मोडतात. विशेष म्हणजे, हा रेझीन घटक पाइन वृक्षांची पाने, फांद्या अशा सर्व भागांत असतो. त्यामुळे आगीसाठी अनुकूल परिस्थितीत ही झाडे चटकन पेट घेतात’, असे डॉ. मराठे यांनी स्पष्ट केले. ‘शिवाय, उष्ण कटीबंधीय वनांमध्ये लागणारे वणवे हे ग्राउंड फायर स्वरूपाचे असतात, तर सूचीपर्णी वृक्षांच्या समशीतोष्ण वनांमधील वणवे हे ग्राउंड फायर बरोबर क्राउन फायर (झाडांच्या शेंड्याला आग लागणे) ह्या प्रकारात मोडतात. डोंगराच्या खालून आग लागते आणि ती वरच्या दिशेने पसरत जाते. तीव्र उतारामुळे भयावह आगींवर नियंत्रण मिळवण्याच्या कामी अनेक आव्हाने असतात’, असे डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी सांगितले.

वणव्यांमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी नियंत्रित ज्वलन (कंट्रोल्ड बर्निंग) हाच एकमेव उपाय असतो. आगीच्या मोसमाचा सामना करण्यासाठी वन खात्याकडून आधीपासूनच तयारी केली जाते, मोसमाच्या प्रारंभी नियंत्रित ज्वलनाद्वारे पालापाचोळा काळजीपूर्वक जाळला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही मीटर अंतरापर्यंत फायर लाइन्स निश्चित करून त्यातील पालापाचोळा जाळून टाकला जातो. त्यामुळे वणवा लागल्यास, आग पुढे सरकण्यास इंधनच न उरल्याने प्रतिबंध होतो. भडकलेला वणवा शांत करण्यासाठी काउंटर बर्निंग तंत्राचा वापर केला जातो. वणव्यापासून काही मीटर अंतरावर कौशल्याने नियंत्रित लाग लावून तिथले सरपण जाळून टाकले जाते. परिणामी, आगीला जळाऊ लाकूडफाटा न मिळाल्याने ती शांत होते. प्रतिबंध आणि काउंटर बर्निंग हेच प्रभावी तंत्र ठरते.

एकाआड एका वर्षी मोठे वणवे

या उन्हाळ्यात अधिक वणवे लागत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी उन्हाळ्याच्या मोसमात वणवे लागतातच, याकडे वनाधिकारी लक्ष वेधतात. दोनेक वर्षात पालापाचोळ्याचे प्रमाण प्रचंड वाढते. परिणामी एका वर्षी वणवा लागला नाही, तर पुढच्या वर्षी तो लागतोच. त्यामुळे नियंत्रित ज्वलन महत्त्वाचे आहे, हे तज्ज्ञ अधोरेखित करतात. अर्थात वनांमध्ये आगी आपोआप लागत नाहीत. त्या लावल्या जातात, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. ‘शेतीप्रधान असलेल्या उत्तराखंडमधील मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी वनांवर अवलंबून आहे. गुरोढोरांसाठी ताजे गवत उगवावे, या भावनेतून स्थानिक ग्रामस्थ पालापाचोळा जाळतात. हा गुन्हा असल्याने, आग शांत होईपर्यंत तिथे न थांबता तिथून पळ काढतात. परिणामी आग अनियंत्रितपणे पसरून जंगल खाक होते, हेच अनेक आगींचे मूळ असते. जेमतेम उपजीविकेपुरती शेती करणाऱ्या, पहाडांतील गरिबांवर याबाबत फार बळाचा वापर करणे योग्य नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये जनजागृती हाच एकमेव मार्ग आहे’, असे निवृत्त डीएफओ धनंजय प्रसाद यांनी सांगितले.

दुधईचे वनदूत

जैवविविधता कायदा २००२ अंतर्गत ग्रामपातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जंगलांच्या रक्षणासाठी या समित्यांना प्रभावीपणे कार्य करू शकतात. यासाठी धनंजय प्रसाद यांनी देहराडून जिल्ह्यातील दुधई (तालुका विकासनगर) या गावातील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे उदाहरण दिले. वर्षभर प्रशिक्षण, समुपदेशन, ग्रामस्थांमध्ये जाणीवजागृती या माध्यमातून ही समिती प्रभावी कार्य करत असून मागील अनेक वर्षांत या गावाच्या लगत वणवा लागलेला नाही. त्यामुळे हे ग्रामस्थच आपल्या वनांचे दूत ठरले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पाचोळ्याचा थर म्हणजे दारूगोळा

कोरडा काळ हे एक कारण असले, तरी उन्हाळा हा कायमच वणव्यांचा मोसम म्हणून ओळखला जातो. देहराडूनस्थित निवृत्त विभागीय वन अधिकारी (डीएफओ) आणि जैवविविधता बोर्डाचे सदस्य धनंजय प्रसाद यांनी याविषयी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला अधिक माहिती दिली. हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांच्या (फूटहिल्स) भागात, समुद्रसपाटीपासून पाचशे ते हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर डोंगरउतारावर साल वृक्षाची वने आहेत. उन्हाळ्यात त्याच्या गळलेल्या पानांचा ढीग जमिनीवर साचतो. अनेक ठिकाणी अर्धा ते एक मीटर उंचीचा हा पाचोळ्याचा थर वणव्यासाठी जणू ‘दारूगोळा’ ठरतो. त्याहून अधिक उंचीवर दोन ते पाच हजार फुटांपर्यंतच्या भागात पाइन वृक्ष अधिक असतात. त्यांची अत्यंत ज्लवनशील असलेली सूचिपर्णे वेगाने जळतात. त्यातही पर्वतांच्या उत्तरेकडील उतारांच्या तुलनेत दक्षिणेकडील उतार अधिक कोरडा, कमी वनस्पतींचा असल्याने उष्ण असतो, येथे वणवे अधिक लागतात. डोंगरउतारांवर अग्निशमनाचे काम आव्हानात्मक असते. भडकलेल्या वणव्यापासून ५०-७५ मीटर अंतरावर उभे राहिले, तर घशाला प्रचंड कोरड पडून आग होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या शरीरातील पाणी कमी होते. तीव्र डोंगरउतारांमुळे जिथे साधे पोहोचणे अवघड असते, तिथे वणवे आटोक्यात आणण्याचे आव्हान कित्येक पटींनी वाढते, मग अग्निशमनाची आधुनिक यंत्रसामग्री नेणे तर दूरच, याकडे धनजंय प्रसाद यांनी लक्ष वेधले. पाच हजाराहून अधिक उंचीवरील भागात थंड हवा, पाऊस, गारपीट यांमुळे वणव्यांचे प्रमाण आणि तीव्रता फारशी नसते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T07:20:55Z dg43tfdfdgfd