यांकींच्या देशात...

-मोहन रानडे - फिलाडेल्फिया, अमेरिका

इंजिनीअर झाल्यावर शिक्षण अथवा नोकरीसाठी अमेरिकेला जायचे की नाही, हे मनातले द्वंद्व अनेक वर्षे चालू होते. मित्राच्या आग्रहास्तव मी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि ते मला १९७० साली ताबडतोब मिळाले. मनातून लगेच जायचे नव्हते म्हणून अमेरिकन वकिलातीशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून ग्रीन कार्ड मिळताच तीन महिन्यांत अमेरिकेला जाण्याचा त्यांचा नियम माझ्यापुरता बदलून घेतला (आश्चर्य असे की, त्यांनी बेमुदत वाढवून दिला). इंजिनीअरिंग कॉलेजात असताना आणि त्यानंतर झालेल्या प्रचंड वाचनाने भारताचा आदर्श नागरिक कसा असावा, याबद्दल एक मत झाले होते आणि तसा वागण्याचा प्रयत्न करीत होतो. सुधारित देशातील नागरिक कसे वागत असतील, याची झालेल्या वाचनाने कल्पना होती. परंतु, तसे भारतात वागणे शक्य असले तरी कठीण होते, याची जाणीव होत गेली; आणि १९७४ साली अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.

झालेल्या वाचनाने अमेरिकन जीवनमान अथवा संस्कृती कशी असेल, याबद्दल बऱ्यापैकी कल्पना होती. त्यामुळे अमेरिकेत पोहोचताच तेथे सराईतासारखे वागणे अजिबात कठीण गेले नाही. नोकरी शोधायला लागलो. (त्यावेळी ग्रीन कार्ड देत असत, पण नोकरी स्वतः शोधावी लागे.) पहिल्या काही महिन्यांत ज्याला भारतीय लोक अमेरिकन संस्कृती समजतात, (आणि त्यात बरेच सत्य आहे) ती तशी का, याची उत्तरे मला सापडू लागली. त्यातील काही मुद्दे...

गोड बोला संस्कृती

वर्तमानपत्रातील जाहिराती बघून नोकरीसाठी अर्ज केल्यावर, काही दिवसांत गोड भाषेत लिहिलेली नकाराची पत्रे येऊ लागली. आलेल्या प्रत्येक अर्जाला उत्तर द्यायचे, हा अमेरिकन संस्कृतीचा विशेष. निव्वळ अर्जावरून माझी लायकी यांच्या का लक्षात येत नाही, हे मला समजेना. मी भारतीय आहे म्हणून नकार येत आहेत का, असा विचार करून मी अर्जातून ते लपवू लागलो. म्हणजे, भारतात नोकऱ्या केलेल्या कंपन्यांची नावे काढून टाकली. माझे नाव तर लपवू शकत नव्हतो, त्यामुळे नकारघंटा चालू राहिली. सरतेशेवटी एका फोरमनच्या जागेसाठी प्रत्यक्ष येऊन अर्ज करा, अशी एक जाहिरात पाहिली आणि शिरकाव करून घ्यायला इंजिनीअर नाही तर फोरमन म्हणून काम करायची तयारी ठेवून अर्ज देण्यास हजर झालो. मला बोलायला फारसा वाव न देताच ‘तुला अमेरिकन अनुभव नाही म्हणून विचार करता येत नाही,’ असे उत्तर समोरच्या अधिकाऱ्याने दिले. आता नोकरी तर मिळणार नाहीच मग याला धडा शिकवूनच बाहेर पडावे, असा विचार करून ‘तुला मला नोकरी द्यायची नाही, हे मी समजू शकतो, पण अमेरिकन अनुभव म्हणजे काय हे तुला तरी समजते का? मी तुला आव्हान देतो. तुझ्या फॅक्टरीतील सर्व सामग्री दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे आणि मी अत्यंत आधुनिक भारतीय फॅक्टरीतून अनुभव मिळवला आहे.’ (किर्लोस्कर आणि टेल्को या त्यावेळीही होत्या आणि आजही पुढारलेल्या जगाच्या तोडीच्या कंपन्या आहेत.) या उत्तराने तो अधिकारी चमकला आणि इंजिनीअरची जागा रिकामी असलेल्या खात्यात मला मुलाखतीला पाठवले. अर्थातच मी नोकरीचे पत्र घेऊनच तेथून बाहेर पडलो. भेदभाव करायचा, पण तो गोड बोलत, याचा पहिला अनुभव मी घेतला.

गोऱ्या आणि काळ्या लोकांतील भेदभाव ही त्यावेळची अमेरिकन संस्कृती होती. गोरे लोक गोड बोलून ती झाकायचा प्रयत्न करीत आणि आपल्या हक्कांसाठी काळे लोक देशभर आंदोलन करीत असत. आता ५० वर्षांत परिस्थिती खूप बदलली आहे. भारतीय लोक बहुसंख्येने येत असल्याने भारतीयांना खूपच चांगले वागवले जाते, तरीही अमेरिकेच्या काही पट्ट्यात भेदभाव दिसतोच.

मी भारतात असताना कम्युनिझम चांगला की कॅपिटॅलिझम, असा मनाशी विचार करताना नेहमीच कॅपिटॅलिझमला झुकते माप देत असे, पण अमेरिकेत आल्यावर असे लक्षात आले कि दोन्ही ‘इझम’ आहेत, जे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवू बघतात - एक उघड उघड दंडेली करतो, तर दुसरा गोड बोलतो. भारत या दोन्ही ‘इझम’चा सुवर्णमध्य राखायचा प्रयत्न करतो, असे सध्या तरी दिसते.

स्वच्छता संस्कृती

भारत सोडून इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशात गेलात तर त्या देशांची स्वच्छता नजरेत भरते. मी या समस्येचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, इतर देश नशीबवान आहेत, कारण तेथे निसर्ग १२ महिने पाऊस पाडून भूमी स्वच्छ ठेवतो. ती हिरवीगार दिसते. आपला हिमालय पूर्व-पश्चिम पसरण्याऐवजी उत्तर-दक्षिण पसरलेला असता तर भारतात १२ महिने पाऊस पडला असता आणि देश असाच सुंदर दिसला असता. देश स्वच्छ ठेवण्यामागे नागरिकांचा हातभार किती? तर माझ्या मते थोडा. शाळकरी मुलांपासून ‘सर्वजण कचरा टोपलीत टाका’ या सवयीत वाढलेले असतात आणि येथे कचरा टोपल्या चोरीला जात नाहीत कारण त्यांना किंमत नाही. येथील नागरिक सिगारेटची थोटके गाडीत ट्रे असला तरी रस्त्यावर फेकतातच ना! यांच्या घरात गेलात तर भारतीयांसारखीच ती अस्वच्छ सापडतात. म्हणून हा जपानसारखा स्वच्छताप्रिय देश आहे, असे मी मानत नाही. भारतातील परिस्थिती हळूहळू बदलत आहे. जेथे स्वच्छतेसाठी नोकर लावले जातात (मग ती अमेरिका असो वा भारत) तेथे स्वच्छता आपसूक सापडते.

कायदा पाळा संस्कृती

नागरिक शास्त्रात प्रामुख्याने शिकवले जाते, ते कायदा पाळा हे तत्त्व. भारतात ते पाळले जात नाही व पाश्चिमात्य देशात पाळले जाते, असा समज आहे. तो थोडाफार बरोबर आहे. अमेरिकेतील सर्व नागरिक कायद्याप्रमाणे वागणारे असते तर पोलिसांची गरज लागली नसती. येथील नागरिक कायदा पाळतो कारण पकडले जाऊ आणि दंड होईल, याची त्याला भीती असते. ती भारतात नसते. येथे पोलिस जुजबी लाच घेत नाही, कारण त्याचा पगार भरपूर असतो आणि त्याला लाच घेताना पकडले जाण्याची भीती असते. लाल सिग्नल तोडला तर दंड २५ डॉलर. पोलिसांनी पकडले तर तुम्ही त्याला १०० डॉलर देऊन बघा, तो लगेच खिशात घालील. २० डॉलर घेणार नाही, कारण त्याची त्याला किंमत नाही आणि त्यालाही पकडले जाण्याची भीती आहे. राजकीय पुढारी लाच खाल्ल्याने कैदेत गेल्याची उदाहरणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे हे की, केलेले कायदे आपल्या भल्यासाठी आहेत, हे सर्व सूज्ञ नागरिकांना कळते. भारतीय नागरिक शिक्षित असला तरी त्या शिक्षणाचा काही उपयोग झाला आहे, असे दिसत नाही (उदा. भारतीय विमानातील प्रवासी - सीट बेल्ट साइन जाण्याअगोदर उठून पळण्याच्या घाईत असतात. तो वाचलेला वेळ कुठे सत्कारणी लागला, असे दिसते का?) सर्वात महत्त्वाचा फरक अमेरिकेतील नागरिक त्याला पटत नाही म्हणून कायदा मोडत नाही, मग राजकारणी काहीही करोत. त्या उलट भारतीय नागरिक स्वतःत सुधारणा करण्याऐवजी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात पटाईत.

‘दुसऱ्याच्या हक्कांची पायमल्ली करू नका’ - संस्कृती

मी एका संधाकाळी माझ्या अपार्टमेंटच्या गॅलरीत बसलो होतो. समोरच्या बिल्डिंगमध्ये एक अमेरिकन वृद्ध गृहस्थ बसला होता. बिल्डिंगच्या दारासमोर कुणी पार्किंग करू नये, यासाठी त्या जागेवर पिवळ्या रंगात मोठी फुली मारली होती. थोड्या वेळात त्याचा जावई गाडीतून आला आणि कुठे पार्किंग दिसेना म्हणून त्याने बिल्डिंगसमोर त्या पट्ट्यांवर गाडी लावली. तो गाडीतून उतरतो तोच त्याचा सासरा वरून ओरडला ‘काय रे आंधळा झालास का?’ जावई काय ते समजला आणि त्याने गाडी दुसरीकडे लावली. किती भारतीय सासऱ्यांनी आपल्या जावयाला असे सुनावले असते?

नियम हे आपल्यासाठी नसून दुसऱ्यांसाठी आहेत, हे भारतीय वागणुकीत भिनलेले आहे आणि येथे तसे दिसन नाही.

‘खालच्यांना चेपा’ संस्कृतीचा अभाव

भारतातील मुलाला कळायला लागले की ते काय बघते? घरातील मालकीण कामवालीला दरडावत असते, वडील ड्रायव्हरवर ओरडत असतात, ऑफिसात वरिष्ठ हाताखालच्यांना दाबत असतात, हॉटेलात वेटरवर मग्रुरी केली जाते. थोडक्यात अशा तणावाच्या वातावरणात रोजचा दिवस जातो. त्यामुळे ते मूल मोठे झाले की, तसेच वागायला शिकते. या उलट काम करणारी व्यक्ती एक माणूस आहे या भावनेने परदेशात व्यवहार होतात

सर्व संस्कृतीत मूळ तत्त्व समान असतात. त्यामुळे चांगल्या अथवा वाईट संस्कृतीचा मक्ता कुणी एका समूहाने किंवा देशाने घेऊ नये. बरे अथवा वाईट हे वागणुकीत असते, संस्कृतीत नव्हे!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T10:43:59Z dg43tfdfdgfd