नेपाळने शुक्रवारी लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या वादग्रस्त प्रदेशांना दर्शविणाऱ्या नकाशासह १०० रुपयांची नवीन नोट छापण्याची घोषणा केली आहे. नेपाळच्या या निर्णयानंतर आता दोन्ही देशांचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणावर आता भारताने भूमिका स्पष्ट केली असून परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते भुवनेश्वरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, नेपाळच्या निर्णयाने जमिनी स्तरावर परिस्थिती बदलणार नाही. मुळात या प्रकरणावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. या तिन्ही प्रदेशांवरून दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. असे असतानाही नेपाळने त्यांच्या नोटांवरील नकाशात हे प्रदेश दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी आहे.
हेही वाचा – ‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे तिन्ही प्रदेश भारत आणि नेपाळच्या सीमेवर आहे. या प्रदेशांवर नेपाळने दावा केला आहे, तर हे प्रदेश भारताच्या हद्दीत असल्याचे भारत सरकारने म्हणणे आहे. दरम्यान, नेपाळच्या सरकारमधील मंत्री रेखा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना, १०० रुपयांच्या नव्या नोटेवरील नकाशात लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे तीन प्रदेश दाखवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्या माहिती त्यांनी दिली. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
2024-05-05T04:28:27Z dg43tfdfdgfd