हंगामातील शेवटचा दिवस मच्छिमारांसाठी आनंदाचा; शेवटच्या फेरीत मासळीच मासळी

म. टा. वृत्तसेवा, वसई : मत्स्यव्यवसाय विभागाकडून यंदा १ जून पासून मासेमारीबंदी जाहीर करण्यात आली आहे. मासेमारी बंद झाल्याने वसईतील मासेमारी नौका सध्या किनाऱ्यावर विसावल्या आहेत. विशेष म्हणजे मासेमारी बंदीचा शेवटचा हंगाम चांगला गेल्याने वसईतील मच्छिमारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

पावसाळा हा मत्स्यप्रजातींसाठी प्रजननाचा काळ असतो. शिवाय वादळी वाऱ्यांचाही धोका असतो. त्यामुले या कालावधीत दोन महिने मासेमारी बंद ठेवली जाते. त्यामुळे सध्या वसई, पाचूबंदर, अर्नाळा, कळंब, राजोडी, मर्सेस, खोचिवडे, पाणजू या भागातील सुमारे पाचशे मच्छिमार नौका कोळी बांधवांनी किनाऱ्याला लावल्या आहेत.

मासेमारीची एक फेरी ही १४ ते १५ दिवसांची असते. मच्छिमार बोटी पाणी, इंधन, बर्फ, अन्नधान्य यांसह खलाशी घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जातात. एका फेरीसाठी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च येतो. मागील महिन्यात मासळी जाळ्यात सापडत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाला होता. मात्र आता हंगामातील शेवटच्या फेरीत मात्र दर्याराजाने या मच्छिमारांना खुश केले आहे. याआधीचे नुकसान या शेवटच्या फेरीतल्या मासळीच्या विक्रीने पूर्णतः भरून निघणार नसले, तरी मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाळी, बोटींची डागडुजी

सध्याच्या बंदीच्या काळात मच्छिमार मासेमारीच्या साहित्याची जमवाजमव करण्याच्या कामाला लागले आहेत. बंदीच्या कालावधीत मासेमारीसाठी जाळी विणणे, बोटींची डागडुजी करणे याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.

2023-06-01T08:48:31Z dg43tfdfdgfd