Powai Lake Overflow: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठलं होतं. लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पावसामुळे मुंबईतला पवई तलाव ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरफ्लो झालेला हा पहिला तलाव आहे. (Mumbai News)
मुंबई महापालिका क्षेत्रातील पवई तलाव हा एक कृत्रिम तलाव आहे. हा पवई तलाव सोमवारी पहाटे 4.40 च्या सुमारास पूर्ण भरला. पण 545 कोटी लिटरची जलधारण क्षमता असतानाही या तलावाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. औद्योगिक वापरासाठी आणि आरे कॉलनीत इतर काही सुविधांसाठी हे पाणी वापरले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खूप पाऊस पडला. त्यामुळे पवई तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंत्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
सोमवारी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साठल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. नोकरदार वर्गाला कार्यालयात जाण्यासाठी खूप कसरत करावी लागली. सोमवारी मध्यरात्री फारसा पाऊस पडला नाही. मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मंगळवारी मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे.
हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातल्या शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या व्यतिरिक्त विदर्भातही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
2024-07-09T08:33:17Z