मुंबई : महायुती सरकारच्या सत्ता समीकरणात ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मित्र पक्षांना द्यावे लागले, अशा जिल्ह्यातही आता भाजपने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या तब्बल १५ जिल्ह्यांत भाजपचे मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम करणार आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातही भाजपने संपर्कमंत्री नेमले आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी या विशेष नेमणुका करण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने आपले मंत्री गणेश नाईक यांच्याकडे संपर्कमंत्रिपद सोपविले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मंगलप्रभात लोढा हे संपर्कमंत्री असतील. अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना संपर्कमंत्री बनविण्यात आले आहे. पुणे जिल्हा संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गोंदिया पंकज भोयर, बुलडाणा आकाश फुंडकर, यवतमाळ अशोक उईके, वाशीम राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगर अतुल सावे, बीड पंकजा मुंडे, धाराशिव जयकुमार गोरे, हिंगोली मेघना बोर्डीकर, जळगाव गिरीश महाजन, नंदुरबार जयकुमार रावल, मुंबई शहर मंगलप्रभात लोढा, ठाणे गणेश नाईक, रत्नागिरी आशिष शेलार, कोल्हापूर माधुरी मिसाळ आणि पुणे चंद्रकांत पाटील. भाजपचे कार्यकर्ते आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी संपर्कमंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे.
2025-02-05T05:23:38Z