-पूनम अश्विन कोल्हटकर, गुरुग्राम
मी गेल्या रविवारच्या लेखात म्हटल्याप्रमाणे साधारण १९९०च्या सुमारास मराठी समाज गुरुग्राममध्ये येण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. स्वकष्टाने मराठी समाजातील बरेच लोक बऱ्यापैकी सधन झाले. गुरुग्राममध्ये फिरताना ही गोष्टी प्रकर्षाने जाणवते. त्याचवेळी, नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी मराठी समाजासोबतच देशातील इतर राज्यांतूनही अनेक कर्तबगार तरुण येथे आले. आधी गुरुग्राम तसे फार मोठे नव्हते. मात्र हळूहळू त्याचा पसारा विस्तारत गेला. लोकसंख्या वाढत गेली. उद्योगधंदे, व्यवसाय वाढीस लागले आणि सोबत अर्थातच गुरुग्रामचे झपाट्याने शहरीकरण झाले.
आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली आणि आमचे गुरुग्राम हे एकमेकांच्या अगदी निकट. म्हणजे आपल्याकडे मुंबई आणि ठाणे कसे आहे, किंवा पुणे आणि चिंचवड कसे आहे तसेच. दिल्लीचे जसे गुण आहेत, तसेच कित्येक अवगुण देखील आहेत. दिल्लीतील अवगुणांचा वारा मग गुरुग्रामला देखील लागला. मुळात गुन्हेगारीचे प्रमाण गुरुग्राममध्ये अंमळ अधिक होतेच. त्यात, शहरीकरणामुळे चांगलीच वाढ झाली. सगळ्यांत गंभीर आणि चिंता वाटावी, अशी गोष्ट म्हणजे शाळकरी मुलांमध्ये देखील असे प्रकार दिसतात. तसेच, शाळकरी मुलांमधील व्यसनाचे प्रमाण देखील वाढते आहे. आमच्या बोलण्यात अनेकदा हा विषय येत असतो. अर्थात, फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या अनेक शहरांमध्ये ही समस्या हल्ली वाढताना दिसते आहे. या समस्येवर सर्वच घटकांनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे वाटते.
इथल्या महिलावर्गाबाबत काही निरीक्षणे नोंदवायला हवीत. मी मुंबईत राहिलेली असल्याने आपल्याकडील महिला व येथील महिला यांतील फरक अगदी ठळकपणे जाणवला नि आजही जाणवतो. इथे देखील उत्तम शिकलेल्या महिला उत्तमपैकी, वरच्या हुद्द्यांवर नोकरी करतात. सोबत घरही सांभाळतात. आत्मविश्वासाने सर्वत्र वावरतात. घरच्या सधन असतात. आई वडील दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असल्याने अशा घरांतील मुलांना पाळणाघरात ठेवायची पद्धत इथेही आता रुळली आहे. एकूण विचार केला तर तुलनेने नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे. गृहिणींची संख्या अधिक. येथील महिलांना सणवार, व्रतवैकल्ये यांची फार आवड दिसते. दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, रामनवमी, गणेशोत्सव, दहीकाला हे सण वा उत्सव सगळीकडेच साजरे होत असतात. पण यांसोबतच बैसाखी, वसंत पंचमी, हरियाली तीज, करवा चौथ, विश्वकर्मा पूजा, छटपूजा या सणांना देखील इथे खूप महत्त्व आहे. सण साजरे करण्यात महिला आघाडीवर असतात. त्यात त्या अगदी गुंतून गेलेल्या असतात.
इथल्या महिलावर्गाबाबत नोंदवण्यासारखे आणखी एक निरीक्षण म्हणजे त्यांच्यातील अनेकींनी असलेली नटण्याची हौस! त्यात त्यांचा बराच वेळ जात असणार. अगदी साधी भाजी आणायला किसान मंडीमध्ये जायचे असेल तरी लिपस्टिक लावतील... दागिने घालतील. बघून असे वाटेल की कुठल्या समारंभाला चालल्या आहेत की काय! आपल्याला मुंबई-पुण्यात असे बघण्याची सवय नसते. मला सुरुवातीला विचित्रच वाटायचे; पण आता बघून बघून सवय झाली आहे. श्रीमंती मिरवण्याची सवय देखील येथे प्रकर्षाने दिसते. आणि केवळ मिरवणे असे नाही तर पैशांची मिजास देखील. गुरुग्राममध्ये आता मॉल्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. सगळे चकाचक मॉल्स. सगळे मॉल्स भरभरून ओसंडत असतात. त्यात खरेदी करणाऱ्या या प्रामुख्याने धनिक, श्रीमंत घरांतील महिला असतात.
गुरुग्रामचे राज्य हरियाणा. हरियाणा म्हटले की लगेचच डोळ्यांसमोर उभी राहतात ती या राज्यातील तगडी माणसे. या तगडेपणामुळे हरियाणात क्रीडासंस्कृतीचा विकास चांगल्यापैकी झालेला आहे. गुरुग्रामच्या ग्रामीण भागात ही बाब अगदी ठळकपणे दिसते. व्यायामशाळा, कुस्तीचे आखाडे अनेक ठिकाणी दिसतात. या भागात गोशाळांची संख्या मोठी आहे. पशुधन भरपूर आहे. दूध, दुधापासूनचे पदार्थ यांची रेलचेल आहे. पनीरशिवाय इथल्या लोकांचे जेवणच होणार नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पनीर, ५६ भोगी मिष्टान्ने यांवर लोक निरतिशय प्रेम करतात. बाजरीची रोटी आणि सरसोचा साग अमाप प्रिय आहे. आठवड्याच्या अखेरीस सगळी हॉटेले तुडुंब भरलेली असतात. अनेक ठिकाणी हॉटेलांबाहेर खवय्य्यांच्या रांगा लागलेल्या असतात.
खाण्यासोबतच गाणेही इथल्या लोकांना प्रिय आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, वाद्य संगीत इत्यादी शिकवणाऱ्या अनेक संस्था गुरुग्राममध्ये आहेत. त्यामध्ये अनेकदा प्रवेश मिळत नाही, अशी स्थिती असते. या संगीतसंस्थांमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आपली कला छान जोपासतात आणि प्रसंगपरत्वे सर्वांसमोर छानपैकी सादरही करतात.
मुंबई-पुण्यातून येथे येणाऱ्या पाहुण्यांना इथे दाखवण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. मुख्य म्हणजे अर्थातच दिल्ली. राजधानीचे हे शहर केवळ एक तासाच्या अंतरावर आहे. गुरुग्राममध्ये दमदमा झील, अप्पू घर, सुलतानपूर पक्षी विहार, फन अँड फूड व्हिलेज, लेजर व्हॅली, शीतला माता मंदिर, लोहागड फार्म, आलिशान महल अशी अनेक ठिकाणे आहेत. या ठिकाणी पाहुणे रमतात असा अनुभव आहे.
माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या काही फार हृद्य आठवणी गुरुग्रामने दिल्या आहेत. करोनाच्या दिवसांतली आठवण. माझ्या पतीला करोनाने ग्रासले आणि त्याला स्वतंत्र राहण्याची वेळ आली. कुठल्याच रुग्णालयात तेव्हा जागा मिळत नव्हती. आमच्या परिचयातील डॉ. रवी गुप्ता यांनी बरेच प्रयत्न केले. अखेरीस आमच्याच इमारतीत एका रिकाम्या फ्लॅटमध्ये सोसायटीच्या मॅनेजरच्या ओळखीने आम्ही त्यांची राहायची सोय केली. त्या फ्लॅटचे मालक रणजीत सिंगला हे दिल्लीवासी होते. पतीला बरे वाटल्यानंतर आम्ही फ्लॅटची चावी द्यायला दिल्लीला गेलो आणि भाडे देऊ केले. तर, ‘अशा आपत्तीच्या काळात पैसे घेणे शरमेची गोष्ट आहे’, असे म्हणत मालक रणजीत सिंग यांनी भाडे घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी आम्ही खरोखर गहिवरायला झाले.
गुरुग्राममध्ये आल्यानंतर पहिली पाच वर्षे आम्ही सेक्टर ५६मध्ये ‘मैत्री’ सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होतो. सुरुवातीला दरमहा भाडे होते २८ हजार रुपये. दरवर्षी त्यात थोडीशी वाढ व्हायची. नंतर आम्ही सेक्टर ६८मध्ये, मरिना सहनिवासमध्ये स्वतःचा फ्लॅट घेतला. मैत्री सोसायटीमधील भाड्याचे घर सोडले तो दिवस आजही स्पष्ट आठवतो. मला माझ्या मैत्रिणींनी सेंड ऑफ दिला. शिफ्टिंगच्या दिवशी ज्योती माझ्या गळ्यात पडली आणि खूप रडली. मलाही अश्रू अनावर झाले.
आपण कुठल्याही इलाख्यात गेलो तरी एक-दोन तरी जिवाभावाची माणसे मिळतातच. त्यांचे निस्सीम प्रेम आपल्याला मिळते. मला ते आधीच्या घरातही मिळाले आणि आता नवीन घरात आल्यावर इथेही मिळत आहे.
आज मी विचार करते तेव्हा वाटते की, मी विवाहानंतर गुरुग्राममध्ये राहायला यावे, अशी नियतीची योजना असावी व त्यानुसार मी येथे आले. माझ्याबरोबर माझ्या माहेरच्या आठवणी फोटोंच्या रूपात, पत्रांच्या रूपात घेऊन आले. हळूहळू स्थिरावत गेले. सुरुवातीला, आपण दूर कुठेतरी फेकले गेलो आहोत, अशी माझी भावना झाली होती. मात्र माझ्या इथे जोडल्या गेलेल्या जिवलग मैत्रिणी, इथला सर्वसमावेशक वृत्तीचा समाज, माझे घर, माझे पती आणि अर्थातच माझी सकारात्मक वृत्ती यामुळे ती भावना हळूहळू लोप पावत गेली.
आता, मुंबईला गेले की घरी वा इतर कुठे मराठीत बोलत असताना पटकन एखादा हिंदी शब्द बोलण्यात येतोच येतो आणि हशा पिकतो. मग मला आणि कदाचित समोरच्यांनाही प्रश्न पडत असावा की मी आता मुंबईकर राहिली आहे की, हरियाणवी झाले आहे?
खरे तर या प्रश्नावर मला ठाम उत्तर देता येणार नाही. यातच काय ते समजा!
2025-07-06T07:31:13Z