- प्रतीक मोरेआपल्या शिंगासारख्या चोचीमुळे सहज लक्षात राहणारा आणि जंगलनिर्मितीच्या पर्यावरणीय कार्यामुळे महत्त्वाचा असणारा धनेश पक्षी गेल्या काही वर्षांपासून संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या धनेशच्या चार प्रजाती संकटग्रस्त आहेत. जंगलतोडीमुळे अधिवास खंडित होणे, आंबा, काजू, रबर, अननस, ऑइल पाम यांसारख्या एकसुरी लागवडींमुळे जंगलाची घटलेली विविधता आदी कारणांसह आता हवामानबदल आणि तापमानवाढीचे संकट धनेशसमोर उभे ठाकले आहे.पश्चिम घाटातील पाचही राज्यांत धनेशची मादी ढोली सोडून बाहेर येणे आणि त्यामुळे विण अर्धवट राहण्याचे प्रकार वाढत आहेत. मादी धनेश वर्षातून एकाच पिल्लाला जन्म देते. त्यामुळे प्रजननावर होणारा विपरीत परिणाम हा त्यांच्या जीवनक्रमावर परिणाम करतो. गेल्या वर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू या चारही राज्यांत ढोलीत जाऊन मादीने अंडी देण्याच्या प्रक्रियेला उशीर होत आहे. सामान्यत: डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबल्याचे निरीक्षण आहे. याच कालावधीत ढोली सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. यावर्षीही फेब्रुवारीपर्यंत विणीचा हंगाम सुरू झाला नसल्याचे निरीक्षण आहे. धनेशचा अधिवास दर वर्षी २७ टक्क्यांनी घटत असल्याचे जागतिक संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. कोकणात वृक्षतोड, देवरायांचे संकुचिकरण, जंगलांची घटती विविधता आणि खाद्य वृक्षांची कमतरता आदी कारणे धनेशच्या वाढीवर परिणाम करत आहेत. त्याचबरोबर, सदाहरित आणि प्राथमिक वनांचे पानझडी वनांमध्ये होत असलेले रूपांतरही यासाठी कारणीभूत ठरत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत निरीक्षण आणि प्रजनन प्रक्रियेच्या नोंदी धनेश मित्र चळवळीच्या माध्यमातून केल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत धनेशचे खाद्य वृक्ष असणाऱ्या प्रजातींचे फळधारणा हंगाम बदलत आहेत. पिल्ले बाहेर पडत असताना खाद्याची उपलब्धता कमी असते. यासाठी निरीक्षणे आणि नोंदी घेण्याचे काम संशोधक आणि सामाजिक संस्थांनी हाती घेतले आहे. त्यातून धनेशच्या संवर्धनाचे उपाय नक्कीच पुढे येतील.
2025-02-05T09:09:05Z